कोरोनाने आणली उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:55+5:302021-01-24T04:13:55+5:30
हिंगोली : कोरोना आधी दोनशे रुपये कसे तरी पदरात पडायचे. परंतु, आज कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी ग्राहक ...

कोरोनाने आणली उपासमारीची वेळ
हिंगोली : कोरोना आधी दोनशे रुपये कसे तरी पदरात पडायचे. परंतु, आज कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी ग्राहक कोरोनाच्या भीतीमुळे बाहेर येईना झाले आहेत. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? हा यक्ष प्रश्न पडला आहे.
सायकलचे पंक्चर काढणे, मोटारसायकलचे पंक्चर काढणे, मोटारसायकलमध्ये हवा मारणे व सायकल रिपेअरिंग करणे यातून मिळालेल्या रोजगारातून पत्नी व मुला बाळांचा सांभाळ केला जायचा. दिवसाकाठी कसे तरी दोनशे रुपये पदरात पडायचे. परंतु, आजमितीस शंभर रुपये पडणेही मुश्कील झाले आहे. कोरोना आधी शाळा, महाविद्यालय चालू होती. तेव्हा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पंक्चरच्या दुकानावर येत असत. त्यामुळे रोज अडीचशे ते तीनशे घरी घेऊन जात असे. आज परिस्थिती उलटी झाली आहे. कोरोनाने उपासमारीची वेळ आणली आहे.
शहरात सायकल दुरुस्ती, पंक्चर काढणे, हवा मारणे आदी जवळपास आठ ते दहा दुकाने असतील. सर्वांची हालत हिच आहे. प्रत्येक जण आज हलाखीचे जीवन जगत आहे. शासनाने फूटपाथवर काम करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना शासन कोट्यातून आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
उदरनिर्वाह कसा करावा?
कोरोना आजाराचे प्रमाण आजमितीस कमी झाले आहे. परंतु, लोक बाहेर पडण्यास धजत नाहीत. मोटारसायकल, सायकल दुरुस्तीला आली तरच दोन पैसे हातात पडतील. हातात पैसे पडल्यानंतरच अन्नधान्य घरी घेऊन जाता येईल. सद्य:स्थितीत नशिबालाही दोष देता येत नाही. कोरोना आधीसारखे पदरात पडत नसले तरी जे आहे त्यातच समाधान मानत आहे. शासनाने आम्हा छोट्या व्यवसाय चालकांना आर्थिक मदत करावी.
-फारुख पठाण, शिवाजीनगर