कृत्रीम पाणवठ्यातून वन्यजीवांची भागणार तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:29 AM2021-03-06T04:29:07+5:302021-03-06T04:29:07+5:30
हिंगोली : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेता, येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून ...
हिंगोली : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेता, येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून परिक्षेत्रात ठिकठिकाणी पाणवठे उभारून त्यात पाणी सोडण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात हरिण, नीलगाय, वानर, पक्षी यांसह इतर वन्यप्राण्यांची संख्या बऱ्यापैकी आहेत. सध्या डोंगराळ भागातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्याची पाण्यासाठी भटकंती होत आहे. अनेक वेळा मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. यातून वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे माळरानावर पाणवठे उभारून, त्यात टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन विभागीय वन अधिकारी कार्यालयाने आखले होते. त्यानुसार, विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली वनपरिक्षेत्रातील महालिंगी, वाई, करंजाळा, वारंगा आदी ठिकाणी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पाणवठे उभारण्यात आले. यात टँकरद्वारे पाणी टाकण्यात आले. पाणवठ्यात पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यात मदत होणार आहे. यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, गणेश मिसाळ, नरसिंग ताेलसरवाड आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
फोटो २६