हिंगोलीत व्हेंटिलेटरची कमतरता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST2021-04-04T04:30:42+5:302021-04-04T04:30:42+5:30
हिंगोली: जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ९७ व्हेंटिलेटर उपलब्ध असून जिल्हा मुख्यालयात ३७ सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने नागरिकांनी ...

हिंगोलीत व्हेंटिलेटरची कमतरता नाही
हिंगोली: जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ९७ व्हेंटिलेटर उपलब्ध असून जिल्हा मुख्यालयात ३७ सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. नागरिकांना वेळोवेळी आवाहन करुनही ते मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत. परिणामी, जिल्हा प्रशासनाला टाळेबंदीसारखा निर्णय घ्यावा लागत आहे. अतीगंभीर रुग्ण असेल तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले जात आहे. जिल्ह्यातील हिंगोली जिल्हा रुग्णालयात ३७, औंढा रोडवरील कोरोना केअर सेंटरमध्ये २०, वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात २० आणि कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात २० असे व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक केंद्रात व्हेंटिलेटर नाही. तेथे जर अतिगंभीर रुग्ण आढळून आले तर त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविले जावून त्यास व्हेंटिलेटरवर ठेवले जावून त्याची काळजी घेतली जाते.
मास्क वापरण्याचे आवाहन
कोरोना संसर्गाने सर्वत्र डोके वर काढले आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचे शासनाने जाहीरही केले आहे. परंतु, नागरिक याकडे कानाडोळा करीत आहेत. दुसरीकडे तरुणमंडळी मास्कचा वापर ‘फॅशन’ म्हणून करीत आहे. बाहेर पडताना मास्कचा योग्य पद्धतीने वापर केल्यास कोरोनापासून दूर राहता येते. विशेष म्हणजे व्हेंटिलेटरची वेळही येणार नाही. तेव्हा मास्कचा वेळेवर वापर करावा, असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी केले आहे.
गोळ्यांपेक्षा भाकरी बरी....जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केले तर कोरोना आपल्याजवळ येतो हे माहित असतानाही अनेक जण विनामास्क आणि विनाकारण बाहेर पडत आहेत. एकदा पॉझिटिव्ह रुग्ण जवळून गेला तर लगेच त्याचा संसर्ग होण्याची भीती असते. त्यानंतर अँटीजन तपासणी केली तर दवाखान्याच्या गोळ्या खाण्याची वेळ ओढावते. तेव्हा गोळ्या खाण्यापेक्षा घरची भाकरी सुखाने खावी, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी दिला आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अतिगंभीर रुग्ण असेल तर त्याला व्हेंटिलेटरही दिले जात आहेत. व्हेंटिलेटरची कमतरता जिल्हा रुग्णालयात सध्या भासत नाही. पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर सर्वत्र आजमितीस आहेत. अतिगंभीर रुग्णांची काळजी डॉक्टर मंडळी घेत आहेत.
डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक