गॅपला बगल देत दहावी, बारावीचे विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:33+5:302021-03-19T04:28:33+5:30
जिल्ह्यात गतवर्षी ५३ केंद्रावर दहावीच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी १८ हजार २२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर ...

गॅपला बगल देत दहावी, बारावीचे विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज
जिल्ह्यात गतवर्षी ५३ केंद्रावर दहावीच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी १८ हजार २२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर बारावीच्या १३ हजार २६५ विद्यार्थ्यांसाठी ३३ केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. दहावी, बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आली असतानाच कोरोनाचे संक्रमण सुरू झाले होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी गॅप देण्याचा निर्णय घेतला होता. २०२०-२१ शैक्षणिक सत्राचा दहावी, बारावीचा अभ्यासक्रम कोरोनामुळे पूर्ण होऊ शकला नाही. तरीही दहावीच्या १९ हजार ४०७ तर बारावीच्या परीक्षेसाठी १४ हजार ३८७ विद्यार्थी बसले आहेत. यावर्षी परीक्षा द्यायची की नाही, या चिंतेत दहावी, बारावीचे विद्यार्थी होते. मात्र ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्याला अनेक शाळांनी प्राधान्य दिले. आता परीक्षा जवळ आली असून कोरोनामुळे गॅप द्यायचा नाही, अशी भूमिका बहुतांश विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
अंतिम मुदतीनंतरच पूनरपरीक्षार्थीची संख्या समजणार
१) दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा अर्ज भरणे अजूनही सुरू आहे. विलंबाने परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरच नियमित व पुनरपरीक्षार्थींची संख्या समजणार आहे. सध्या तरी परीक्षा विभाग केंद्र निश्चितीसाठी तयारी करीत आहे.
२) कोरोनामुळे विद्यार्थी संख्येत घट होईल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र गतवर्षी पेक्षा यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोना असला तरी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत.
दहावीचे परीक्षार्थी
२०२१ -१९४०७
२०२० - १८२२७
बारावीचे परीक्षार्थी
२०२१ - १४३८७
२०२० - १३२६५