शिक्षकांनो, मुख्यालयी राहा अन् जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST2021-04-18T04:28:45+5:302021-04-18T04:28:45+5:30
काही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग वाढतच चालला ...

शिक्षकांनो, मुख्यालयी राहा अन् जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळा
काही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापन, माध्यमाच्या शिक्षकांनीही आपले कामकाज ऑनलाइन, वर्क फ्रॉम होम या तत्त्वावर करावे, या काळात शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, तसेच कोरोनाकाळात दिलेली जबाबदारी विहित कालावधीत पार पाडाव्यात, संचारबंदी काळात मुख्यालय विनापरवानगी सोडू नये, अत्यावश्यक सेवेसाठी भ्रमणध्वनी बंद करू नये, मुख्याध्यापकांनी यू-डायस, शाळासिद्धी, स्वाध्याय, आधार नोंदणी तसेच वरिष्ठ स्तरावरून निर्देशित, निश्चित केलेली कामे वेळेत पूर्ण करावीत, कोणत्याही परीक्षेबाबत शासनस्तरावरून प्राप्त सूचनांचे पालन कराावे, आवश्यकता असल्यास शाळेत प्रवेश करताना कोरोनाबाबतीत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांमुळे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाकाळात शिक्षकांची मदत व्हावी, यासाठी ग्रामपातळीवर कोरोनाविषयक कामांच्या काही जबाबदाऱ्या शिक्षकांवर सोपविल्या आहेत, मात्र त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले होते. एकतर शिक्षक शाळेतही येण्यास टाळाटाळ करीत असून, दुसरीकडे हा प्रकार घडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प.ला याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत हे आदेश काढले आहेत.