कोरोना काळात रेशन दुकानदारांच्या अडचणी दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST2021-04-15T04:28:39+5:302021-04-15T04:28:39+5:30
हिंगोली : कोरोना काळात वारंवार सरकारी निर्बंध लागत असून, यात रेशन दुकानदारांना विविध अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी ...

कोरोना काळात रेशन दुकानदारांच्या अडचणी दूर करा
हिंगोली : कोरोना काळात वारंवार सरकारी निर्बंध लागत असून, यात रेशन दुकानदारांना विविध अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी शासन स्तरावरून परिपत्रक काढण्याची मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने राज्य शासनाकडे केली आहे.
निवेदनात म्हटले की, केंद्र व राज्य सरकारने रास्त भाव दुकानदार यांना, तसेच त्यासंबंधित येणाऱ्या व्यक्तींना म्हणजे हमाल, वाहतूक करणारे यांना सूट दिलेली आहे. तरी सोशल डिस्टन्सिंगचे चांगल्या प्रकारे पालन होण्यासाठी आपण राज्यातील सर्व रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना, तसेच त्यांच्या वाहतूकदारांना, हमालांना सकाळी सात ते संध्याकाळी सात रास्त भाव रेशनिंग दुकाने चालू ठेवण्याचे परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काढावे व तशा सूचना रास्त भाव दुकानदार यांना द्याव्यात.
त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाढत असून, आम्ही वेळोवेळी आपणास रास्तभाव रेशनिंग दुकानदार यांना स्वतःचे आधार अधिप्रमाणित करून धान्य वितरण करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यामध्ये रोज जवळपास ६० ते ७० हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे म्हणून आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून आपण रास्त भाव रेशनिंग दुकानदार यांना स्वतःचे आधार, अंगठे अधिप्रमाणित करून धान्य वितरण करण्याची सूट द्यावी, ई पाॅस मशीनला यूएसबी कॉड दोन मीटरचा बसवून देण्यात यावा जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, अशी मागणीही निवेदनात केल्याचे जिल्हाध्यक्ष भिकूलाल बाहेती, अशोक काळे, फारुखभाई, नवनाथ कानबाळे, आदींनी सांगितले.