दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST2021-03-01T04:33:55+5:302021-03-01T04:33:55+5:30

हिंगोली : नियतनापेक्षा जास्तीचा धान्यपुरवठा केल्याप्रकरणी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. मात्र, या अहवालात अनेक गंभीर ...

Take action against guilty officers, employees | दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

हिंगोली : नियतनापेक्षा जास्तीचा धान्यपुरवठा केल्याप्रकरणी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. मात्र, या अहवालात अनेक गंभीर बाबींना बगल देण्यात आली असून, यातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्यपाल यांच्याकडे विराट राष्ट्रीय लोकमंचचे शेख नईम लाल यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

हिंगोलीचे तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक, गोदामपाल यांनी जानेवारी ते जुलै, २०१९ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने नियतनापेक्षा जास्त १६ हजार २६७. ८८ क्विंटल गहू व तांदळाचा पुरवठा केला. ज्याचे बाजारभाव मूल्य ४ कोटी ६१ लाख २३ हजार ४५८. ४४ रुपये आहे. या रकमेचा अपहार करून पात्र लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवले, तसेच रेशन दुकानदारांशी संगनमत करून शासकीय नियमाप्रमाणे आवश्यक असलेली अभिलेखे व दस्तावेज गहाळ करून पुरावे नष्ट केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार, चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. मात्र, या अहवालात गंभीर बाबींना बगल देत, संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा १० मार्च रोजी मुख्यमंत्री निवासस्थान किंवा मातोश्री बंगल्यासमोर आंदोलन करणार असल्याचेही या निवेदनात शेख नईम यांनी म्हटले आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहेत.

Web Title: Take action against guilty officers, employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.