दुसऱ्या टप्प्यातील विहिरींतील पाणीपातळी मोजणे सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST2021-04-03T04:26:01+5:302021-04-03T04:26:01+5:30
कळमनुरी : समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत तालुक्यातील ९ गावांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील विहीर व बोअरची पाणीपातळी मोजण्याचे काम सुरू असल्याची माहिती ...

दुसऱ्या टप्प्यातील विहिरींतील पाणीपातळी मोजणे सुरु
कळमनुरी : समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत तालुक्यातील ९ गावांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील विहीर व बोअरची पाणीपातळी मोजण्याचे काम सुरू असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक भागवत कोटकर यांनी दिली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ९ गावांनी त्यांना दिलेली कामे पूर्ण केली. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन सत्कारही करण्यात आला. तालुक्यातील शिवनी खुर्द, जरोडा, नवखा, मसोड, कवडा, बोलडावाडी, वारंगा तर्फ नांदापूर, सालेगाव, रामवाडी या गावांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील पाणीपातळी मोजण्याचे काम सुरू आहे.
या गावांनी पहिल्या टप्प्यात बचतगट स्थापनेचे उद्दिष्ट पूर्ण करणे, गावात पर्जन्यमापक बसवणे, विहीर व बोअरच्या पाण्याचे मोजमाप पूर्ण करणे, गावाला स्वच्छ पेयजलाचा पुरवठा करणे, कुरण क्षेत्र राखीव ठेवणे, वृक्षसंवर्धन आदी कामे पूर्ण करणे, हंगामनिहाय पिकांचे पूर्ण सर्वेक्षण करणे आदी कामे केली आहेत. या नऊ गावांमध्ये जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
पावसाळ्यापूर्वीही या गावातील विहीर व बोअरची पाणीपातळी मोजली जाणार आहे. समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत वर्षातून चारवेळा विहीर व बोअरची पाणीपातळी मोजली जाणार असून, खरीप व रब्बी पिकांना द्यायच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. खरीप व रब्बी हंगामामध्ये उपलब्ध पाण्याच्या पातळीचे नियोजनही या ९ गावांमध्ये केले जाणार आहे.