साहेब, दवाखान्यात जातोय...मेडिकलला जातोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST2021-04-12T04:27:25+5:302021-04-12T04:27:25+5:30
हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शिस्त ...

साहेब, दवाखान्यात जातोय...मेडिकलला जातोय...
हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, नागरिक दवाखान्यात जात असल्याचे अथवा औषधी आणण्यासाठी जात असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कारवाई करताना पोलीसही दुहेरी संकटात सापडत आहेत.
हिंगोली शहरात कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना राबवीत असले तरी काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊन रुग्णसंख्या वाढत आहे. प्रशासनाने संचारबंदीचे आदेश लागू करून पाहिले. त्यानंतर शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. हिंगोली शहरात शहर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे नागरिक विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. तरीही काही नागरिक घराबाहेर फिरताना दिसून येत आहेत. याबाबत पोलिसांनी कारवाईसाठी थांबविले असता साहेब दवाखान्यात जातोय, औषधी आणण्यासाठी जातोय, रुग्णाचा डबा देऊन आलो, अशी कारणे सांगत आहेत. या कारणामुळे पोलीसही द्विधा मन:स्थितीत सापडत आहेत.
शनिवारी झालेली कारवाई
हिंगोली शहरात पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कारवाई करीत आहेत. शनिवारी घराबाहेर पडणाऱ्या २६ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रविवारी झालेली कारवाई
हिंगोली शहरात रविवारी ३० नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. शहर वाहतूक शाखेच्या पथकानेही शनिवारी, रविवारी असे दोन दिवस ५०० वाहनचालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाखाचा दंड वसूल केला आहे.
घराबाहेर फिरणाऱ्यांची कारणे सारखीच
हिंगोली शहरात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोलीस कारवाई करीत असले तरी काही नागरिक पोलिसांची नजर चुकवून शहरात फिरत आहेत. पोलिसांनी अडविलेच तर साहेब दवाखान्यात जातोय, औषधी आणण्यासाठी जातोय, अत्यावश्यक सेवेतील वस्तू आणण्यासाठी जातोय, अशी कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करताना अडचणी निर्माण होत आहेत.