आजपासून दुकाने उघडणार ; मात्र रात्रीची संचारबंदी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:14+5:302021-03-08T04:28:14+5:30
हिंगोली : जिल्हाभरात कोरोनामुळे १ ते ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता ८ मार्चपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने ...
हिंगोली : जिल्हाभरात कोरोनामुळे १ ते ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता ८ मार्चपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी ॲंटीजेन चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. तसेच रात्रीची संचारबंदी कायम राहणार असून शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत बंदी असणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी १ ते ७ मार्चदरम्यान जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. त्यामुळे जिल्हाभरातील काही दुकाने वगळता पूर्ण बाजारपेठ बंद होती. आता ८ मार्चपासून संचारबंदीच्या नियमांत शिथिलता देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अटी व नियमांचे पालन करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील आस्थापना, दुकाने ८ मार्चपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी व्यापारी, दुकानदार व दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चालू कालावधीतील कोरोना ॲंटीजेन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिला आहे.
आजपासून सुरू राहणार
- जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीत उघडण्यास परवानगी असेल.
- भाजीपाला, फळेविक्री, मांस, मच्छी, मटन, दारू विक्रीची दुकाने सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत उघडण्यास परवानगी असेल.
- दूधविक्रीची दुकाने सकाळी ७ ते १० व सायंकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत चालू राहतील.
- सर्व औषधी दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत तसेच आवश्यकतेनुसार उघडता येणार आहेत.
- जिल्ह्यातील बँका नागरिकांसाठी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत चालू राहतील. परंतु, शासकीय कामकाजासाठी बँका कार्यालयीन वेळेत सुरू राहतील.
- एसटी बसेसने पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असेल. परंतु, इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस शासकीय बसस्थानकाशिवाय इतर कोठेही थांबविता येणार नाहीत.
- बसस्थानकातील कोरोना ॲंटीजेन तपासणी पुढील आदेशापर्यंत चालू राहील. तसेच रेल्वेस्थानकात आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना ॲंटीजेन तपासणी कॅम्प उभारण्यात येणार आहे.
- ऑटोरिक्षा वाहतुकीस २ १, जीप व या प्रकारातील वाहतुकीस ५ १, तसेच खासगी वाहनास ३ १ अशी परवानगी असणार आहे. दुचाकीवर एकाच व्यक्तीस प्रवास करता येणार आहे
- जिल्ह्यातील शासकीय कार्यालये पूर्णवेळ तर खासगी कार्यालये सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल.
- लग्न व लग्नसंबंधित कार्यक्रमांना केवळ ५० व्यक्तींना परवानगी असेल. मात्र, यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची परवानगी बंधनकारक राहणार आहे.
- अंत्ययात्रेस केवळ २० व्यक्तींना परवानगी असणार आहे.
-
काय बंद राहणार
- शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, लॉन्स, मंगल कार्यालये, जलतरण तलाव उघडण्यास परवानगी नसेल.
- रेस्टॉरंट, हॉटेल्स, बियर व वाईन बार उघडण्यास परवानगी नसेल. परंतु, रेस्टॉरंट आणि हॉटेल यांना पार्सल सुविधेसाठी सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीत उघडण्यास परवानगी असेल.
- धार्मिक , प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील.
- धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना व मिरवणुकांना बंदी असेल.
-धरणे, आंदोलने, प्रदर्शने इत्यादींना पुढील आदेशापर्यंत बंदी असेल.