जिल्ह्यातील पाच कर्मचाऱ्यांची फौजदारपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:06+5:302021-05-14T04:29:06+5:30
हिंगोली : २०१३मध्ये घेण्यात आलेल्या विभागीय अर्हता परीक्षेत पाच पोलीस कर्मचारी पात्र ठरले असून, त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली ...

जिल्ह्यातील पाच कर्मचाऱ्यांची फौजदारपदी निवड
हिंगोली : २०१३मध्ये घेण्यात आलेल्या विभागीय अर्हता परीक्षेत पाच पोलीस कर्मचारी पात्र ठरले असून, त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. या पात्र कर्मचाऱ्यांची परिपूर्ण माहिती २१ मेपर्यंत पाठवावी, असे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीसाठी २०१३मध्ये विभागीय अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. यात पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पोलीस महासंचालक कार्यालयाने १२ मे रोजी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील स. पोलीस उपनिरीक्षक पंडित रामराव थोरात, बाबू तुकाराम केंद्रे, पोहेकॉ अजिम खा रहेमत खॉ पठाण, साहेबराव सखाराम राठोड, किशन शिवाजी देवरे या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पाचही कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.
या पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांची परिपूर्ण माहिती, जात पडताळणी प्रमाणपत्रासह गुन्हे, निलंबन, शिक्षा, भरती दिनांक आदींची माहिती २१ मेपर्यंत पाठवावी, अशा सूचना घटक प्रमुखांना दिल्या आहेत. दरम्यान, हे कर्मचारी नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नतीच्या विचार कक्षेत विचाराधिन आहेत. ही यादी पदोन्नतीची पात्रता यादी नसून, ती पदोन्नतीच्या कक्षेत विचाराधिन पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची घटकनिहाय यादी असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशावर विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांची स्वाक्षरी आहे.