उरलेल्या दुकानांनाही आता दिवसाआड शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST2021-06-02T04:22:51+5:302021-06-02T04:22:51+5:30
हिंगोली जिल्ह्यात १५ जूनपर्यंत शनिवार व रविवार वगळून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी दोन या वेळेत सुरू ...

उरलेल्या दुकानांनाही आता दिवसाआड शिथिलता
हिंगोली जिल्ह्यात १५ जूनपर्यंत शनिवार व रविवार वगळून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील हॉटेल, रेस्टॉरंट आदींना घरपोच सुविधा देण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र या अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी नव्हती. निदान एक दिवसाआड तरी व्यापाराची मुभा देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून वारंवार केली जात होती. आज अनेक कपडा व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने पेच निर्माण झाला होता. इतरही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. त्यामुळे शहर पोलिसांनी हस्तक्षेप करीत या दुकानदारांना पोलीस ठाण्यात नेले होते. अशांना दंडही आकारण्यात आला.
आता अत्यावश्यक सेवा वगळून इतर अस्थापना, दुकाने २ जूनपासून एक दिवसाआड सकाळी ७ ते २ या कालावधीत उघडता येणार आहेत. ४, ६, ८, १०, १२ व १४ जून रोजी दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेशात एवढाच बदल केला असून पूर्वीच्या आदेशातील इतर बाबी कायम आहेत.
तर दुकानावर कायमची बंदी
ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्तच्या काळात मात्र कोणत्याही अस्थापनांना कोणतीही दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत. तसे आढळून आल्यास कोरोना साथ असेपर्यंत अशा दुकानांवर बंदी घालण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. तसेच याबाबतची तपासणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी करून नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करण्यासही आदेशित केले. यात टाळाटाळ अथवा कारवाईस विरोध केल्यास फौजदारी दाखल करण्याचा इशराही दिला आहे.