दहा वाजता सुरू होते नोंदणी; दहा मिनिटांत लसीकरण केंद्र हाऊसफुल्ल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST2021-05-12T04:30:34+5:302021-05-12T04:30:34+5:30
जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे १ मेपासून आजपर्यंत ४,२७६ लसीकरण झालेले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १३ लाखांच्या ...

दहा वाजता सुरू होते नोंदणी; दहा मिनिटांत लसीकरण केंद्र हाऊसफुल्ल !
जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे १ मेपासून आजपर्यंत ४,२७६ लसीकरण झालेले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १३ लाखांच्या आसपास आहे. यात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ३ लाख ९० हजारांच्या जवळपास असू शकते. या सर्वांना ऑनलाइन नोंदणीही बंधनकारक केली आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण १ टक्का झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यात लसीकरणासाठी ३३ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. लसीकरण आणि आरटीपीसीआर एकाच छताखाली येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने शहरातील कल्याण मंडपम् येथे लसीकरण केंद्र सुरू केले. त्यानंतर लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक व युवकांकडून प्रतिसाद मिळत असल्यामुळे शहरात सरजूदेवी विद्यालयात नवीन केंद्रही निर्माण केले. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी वेळ दिली आहे. एवढे असतानाही या ठिकाणी लसीकरण करून घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.
खरे पाहिले तर ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत, अशांनी विनाकारण गर्दी न करता घरी बसणे त्यांच्यासाठी हितावह ठरणार आहे. परंतु, तेही विनाकारण लसीकरण केंद्रांसाठी गर्दी करू लागले आहेत.
१८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे शासनाने सांगितले आहे. त्याप्रमाणेच नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. लसीकरण केंद्रांवर मास्क व सामाजिक अंतर ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांची कसरत
जिल्ह्यात ३३ लसीकरण केंद्रे असली तरी अनेक ठिकाणी गर्दी दूर करण्यासाठी गार्डची व्यवस्था नाही. जिल्ह्यात लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी काही जण कर्मचाऱ्यांच्या अगदी जवळ जातात. त्यामुळे नोंदणी करताना अडथळा निर्माण होत आहे. लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ सायंकाळी पाच वाजेची असली तरी सर्व रिपोर्ट वरिष्ठांना देईपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यास सायंकाळचे सात वाजत आहेत. ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत, अशांनी केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन डेटा एंट्री ऑपरेटर बालाजी मास्के यांनी केले आहे.