बिल न देताच ‘महावितरण’ची वसुली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:24+5:302021-03-19T04:28:24+5:30
जिल्ह्यातील कृषीपंपधारक ७५ हजार ३१८ असून वीज बिल थकबाकी ११५० कोटी ४३ लाख रुपये एवढी आहे. यापैकी कृषीपंप धोरण ...

बिल न देताच ‘महावितरण’ची वसुली !
जिल्ह्यातील कृषीपंपधारक ७५ हजार ३१८ असून वीज बिल थकबाकी ११५० कोटी ४३ लाख रुपये एवढी आहे. यापैकी कृषीपंप धोरण २०२० मध्ये ६ कोटी ६९ लाख वसूल करण्यात वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांना यश आले आहे. तालुकानिहाय सांगायचे झाल्यास कळमनुरी तालुक्यात १९४ कोटी ५२ लाख, हिंगोली १६७ कोटी २४ लाख, वसमत ३६१ कोटी २४ लाख, सेनगाव २१७ कोटी ७० लाख , औंढा नागनाथ २०९ कोटी ९३ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषीपंपचालकांनी ‘कृषीपंप २०२०’ या योजनेत सहभाग घेतला तर त्यांना भरपूर असा लाभ होणार आहे परंतु, मोजकेच कृषीपंपचालक यात भाग घेत आहेत. कृषीपंप योजनेत सहभाग घेतल्यास सप्टेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२० यामधील विलंब आकारही माफ होणार आहे. विशेष म्हणजे ५० टक्केच वीज भरावी लागणार आहे, असे ‘महावितरण’च्या वतीने सांगण्यात आले.
कृषीपंपासाठी सुरुवातीला ७ हजारांचे कोटेशन भरावे लागते. त्यानंतर ‘महावितरण’च्या कार्यालयाकडे याचा अहवाल दिला जातो. कृषीपंपासाठी लगेच वीज मिळत नाही. यासाठी दीड-दोन वर्षे तरी लागतात. त्यानंतर लाईनमन येऊन सदरील जागेची व कोटेशन पडताळणी करतो. त्यानंतर लाईनमेनने दिलेला अहवाल हा वरिष्ठांकडे सादर केला जातो तेव्हा कुठे तो अहवाल मिळाल्यानंतर वरिष्ठ संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर जावून वीजपुरवठा केला जातो. परंतु, हे सर्व सोपस्कार झाल्यानंतही मात्र संंबंधित शेतकऱ्यांंना वेळेच्यावेळी बिल न देता वसुली केली जाते. काही शेतकरी संंबंधित कार्यालयात जावून ‘आमचे किती बिल आहे’ याची विचारणा करतो. हे असे का व्हावे? याबाबत ‘महावितरण’च्या वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे, पण कोणीही लक्ष देत नाही. बिले न देताच वसुली मात्र केली जात आहे, असे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ७५ हजार ३१८ कृषीपंपचालक आजघडीला आहेत. ‘महावितरण’ची वीजबिल थकबाकी ११५० कोटी ४३ लाख रुपये बाकी आहे. यापैकी ६ कोटी ६९ लाख रुपये आजपर्यंत वसूल केले आहेत. ज्या कृषीपंपचालकांना विजेचे बिल मिळाले नसले तरी त्यांना पैसे भरल्याची रितसर पावती दिली जाते. ज्या कृषीपंपचालकांकडे ‘महावितरण’ची बाकी आहे त्यांनी वेळेत भरणा केल्यास त्याचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
-सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता, महावितरण, हिंगोली