बेस्ट सेवेसाठी चालक -वाहकांना पुन्हा बोलावणे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST2021-03-29T04:17:38+5:302021-03-29T04:17:38+5:30
हिंगोली : शासनाच्या आदेशाप्रमाणे बेस्ट (मुंबई) सेवेसाठी पुन्हा परभणी विभागांतर्गत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील २६ चालक-वाहकांना बोलावणे आले असून ते ...

बेस्ट सेवेसाठी चालक -वाहकांना पुन्हा बोलावणे !
हिंगोली : शासनाच्या आदेशाप्रमाणे बेस्ट (मुंबई) सेवेसाठी पुन्हा परभणी विभागांतर्गत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील २६ चालक-वाहकांना बोलावणे आले असून ते २७ मार्च रोजी रवाना झाले आहेत; परंतु कोरोनामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
दोन महिन्यांपूर्वी परभणी विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तीन आगारांतील चालक-वाहक यापूर्वीच जाऊन आले आहेत. यातील बहुतांश चालक-वाहक पॉझिटिव्ह आलेले आहेत. असे असताना मराठवाड्यातील इतर विभागाला वगळून पुन्हा एकदा परभणी विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्याचाच क्रमांक काढला आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या चालक व वाहकांमध्ये नाराजी आहे.
स्वखुशीने बेस्टची सेवा करण्यासाठी नसून केवळ शासनाचा आदेश आहे, म्हणून आम्ही मुंबईला जात आहोत, अशी भावना चालक-वाहकांनी त्यावेळी बोलून दाखविली. जिल्ह्यातील हिंगोली ११, कळमनुरी ८ आणि वसमत आगारातून १४ चालक-वाहक बेस्टच्या सेवेसाठी गेले आहेत.
खरे पाहिले इतर विभागाच्या तुलनेत परभणी विभागाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्याही जास्तच आहे. दरवर्षी उत्पन्नाच्या बाबतीत परभणी विभाग सरस असतो. मुंबई (बेस्ट)ला जाण्यास काही हरकत नाही. याअगोदर कित्येकवेळा चालक-वाहक हे स्वखुशीने सेवा करण्यासाठी गेले आहेत; परंतु सद्य:स्थिती वेगळी आहे. कोरोना या महामारीमुळे आता पुन्हा जावे वाटत नाही.
...हा एक प्रकारे अन्यायच
मराठवाड्यातील काही विभागांनी अजूनही बेस्टची सेवा केली नाही. परभणी विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली आगाराने याआधी बेस्टला सेवा दिली आहे. त्यावेळेस काही चालक-वाहक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दुसऱ्यांदा बोलावणे म्हणजे एक प्रकारे अन्यायच आहे. बेस्टच्या सेवेला जाण्यास कोणाचाही विरोध नाही; पण सर्वांना न्याय योग्य मिळावा, असे वाटते.
- डी. आर. दराडे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना