लसीकरणासाठी रांगच रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:30 AM2021-05-13T04:30:06+5:302021-05-13T04:30:06+5:30
हिंगोली : लसीकरण सुरळीत व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात चार केंद्रांची स्थापना करण्यात आली; परंतु चारही केंद्रांवर लसीकरणासाठी ...
हिंगोली : लसीकरण सुरळीत व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात चार केंद्रांची स्थापना करण्यात आली; परंतु चारही केंद्रांवर लसीकरणासाठी रांगच रांग लागलेली पहायला मिळत आहे. दुसरीकडे केंद्रावर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे भर उन्हात नागरिकांचा घसा कोरडा पडत आहे.
१ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या पुढील लोकांना लसीकरण देणे शासनाने सुरू केले आहे. विशेष म्हणजे लसीकरणासाठी युवकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे पाहून जिल्हा प्रशासनाने शहरात चार केंद्रांची निर्मिती केली आहे, तरीही लसीकरणासाठी रांगच रांग लागत असल्याचे पहायला मिळत आहे. चारही केंद्रांवर लसीकरण व्यवस्थित व्हावे यासाठी गार्डची व्यवस्था केली असली तरी गार्ड मात्र आलेल्या नागरिकांना रांगेत उभे करण्याऐवजी चक्क बाहेर खुर्ची टाकून बसलेले पहायला मिळत आहेत.
सद्य:स्थितीत शहरातील कल्याण मंडपम् येथे २ (पहिला आणि दुसरा मजला), सरजूदेवी विद्यालय येेथे १ आणि माणिक स्मारक आर्य विद्यालय येेथे १ अशी चार केंद्रे निर्माण केली आहेत.
उन्हाचा पारा गत पाच-सहा दिवसांपासून वाढलेला आहे. वाढत्या उन्हामुळे बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. लसीकरण केंद्रावर पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असतानाही पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे अनेक जण घरूनच पाणी आणत आहेत. खरे पाहिले तर चारही केंद्रांवर नगर परिषदेने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी केली आहे.
वाहने अस्ताव्यस्त ; वृद्धांना त्रास
शहरातील कल्याण मंडपम् पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. शहरातील काही लोकांना हे केंद्र जवळचे असल्याने अनेक जण वाहने घेऊन येतात; परंतु अस्ताव्यस्त वाहने उभी करत असल्यामुळे वयोवृद्धांना लसीकरणाच्या ठिकाणी जाताना अतोनात त्रास होत आहे. नगर परिषदेने अग्निशमन विभाग परिसरात वाहने लावण्यासाठी यापूर्वी जाहीर केलेले असतानाही कोणीही त्या ठिकाणी वाहने उभी करत नाहीत. वाहनांची संख्या पाहता या ठिकाणी गार्डची व्यवस्था करणे गरजेचे आहे.