जवळा पांचाळ परिसरात हरभरा पिकाचे उत्पादन घटले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST2021-04-03T04:26:08+5:302021-04-03T04:26:08+5:30
जवळा पांचाळ परिसरातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु हरभरा पिकाने शेतकऱ्यांना साथ दिली नसल्याचे ...

जवळा पांचाळ परिसरात हरभरा पिकाचे उत्पादन घटले.
जवळा पांचाळ परिसरातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु हरभरा पिकाने शेतकऱ्यांना साथ दिली नसल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहेे. तसेच यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन मूग, उडीद व तूर या खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नसल्याने रब्बी पिकांची पेरणी लांबणीवर गेली होती. अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांच्या पेरणीला उशीर झाल्याने पिकांना हवी तेवढी थंडी व पोषक वातावरण मिळाले नसल्याने रब्बी पिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्याचबरोबर वारंवार ढगाळ वातावरण होत असल्याने फवारणी खर्च वाढला गेला होता. हरभरा काढण्यासाठी आल्याने जवळपास २,५०० रुपये प्रति बॅग प्रमाणे कापण्यात आले व मळणी यंत्रद्वारे काढण्यासाठी २२० रुपये प्रतिक्विंटल दराने काढण्यात आले. शेतकऱ्यांना एका एकरामध्ये तीन ते पाच क्विंटल प्रमाणे उत्पन्न निघत आहे. उत्पन्न कमी निघत असल्याने मळणी यंत्र मालकाला काहीच परवडत नसल्याचे सांगितले. म्हणून त्यांनी सुद्धा भावांमध्ये वाढ केली असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी रब्बी पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असून शेतकरी वर्ग पुन्हा एकदा उत्पन्नाच्या कचाट्यात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांचा लागवडी खर्चही निघाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.