७० गावांतील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST2021-08-12T04:33:27+5:302021-08-12T04:33:27+5:30
स्वच्छ भारत मिशन २०२०-२१ मध्ये ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकडे शासनाने लक्ष वेधले आहे. यात ७० ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात ...

७० गावांतील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात अडचणी
स्वच्छ भारत मिशन २०२०-२१ मध्ये ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकडे शासनाने लक्ष वेधले आहे. यात ७० ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात निवड झाली आहे. यामध्ये अंदाजपत्रकीय रकमेतील मंजुरीची रक्कम महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून मस्टरद्वारे प्रदान होणार आहे. ही रक्कम वगळता ७० टक्के स्वच्छ भारतकडून, तर ३० टक्के ग्रा.पं.ने १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. ७० ग्रामपंचायतींच्या कामांना ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत निविदा काढून प्रारंभ केला जाणार आहे. यात ५ हजार लोकसंख्येच्या गावास ३४५ रुपये प्रतिव्यक्ती तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावास ७०५ रुपये प्रतिव्यक्ती याप्रमाणे निधी उपलब्ध होणार आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे हा निधी मिळत असल्याने आधीच तो अपुरा आहे. त्यात रोहयो, वित्त आयोगाची सांगड घातल्याने अजून बिकट प्रश्न बनला आहे. त्यातच काही ठिकाणी ग्रा. पं. च्या कामात जि. प. कडून हस्तक्षेप वाढल्याने पेच निर्माण होत आहे.
या योजनेत सध्या २.६३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, तर ४.१८ कोटींची मागणी आहे. केंद्र व राज्याचा मिळून स्वच्छ भारत मिशनचा ६.८१ कोटींचा हिस्सा राहणार आहे. तर १५ व्या वित्त आयोगातून २.९२ कोटी द्यावे लागतील. मनरेगातून मजुरीवर २.४३ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. तर ही कामे पूर्ण होऊ शकतात.
या ७० गावांची झाली निवड
हिंगोली तालुक्यात फाळेगाव, सावरगाव बं, खानापूर चित्ता, नर्सी ना., बळसोंड, पेडगाव, पहेनी, बासंबा, आडगाव, कोथळज, पांगरी, इसापूर, साटंबा, खेड, सरकळी, कनका, कळमनुरी तालुक्यात बाभळी, पाळोदी, आखाडा बाळापूर, उमदरवाडी, वारंगा फाटा, वाकोडी, येहळेगाव तु., पोतरा, दांडेगाव, मसोड, बोथी, वारंगा त. नांदापूर, येहळेगाव गवळी, दाती, सेलसुरा, सेनगाव तालुक्यात गोरेगाव, पानकन्हेरगाव, केलसुला, केंद्रा बु., पुसेगाव, कडोळी, जवळा बु., साखरा, ताकतोडा, भानखेडा, कवठा बु., बन, औंढा तालुक्यात पिंपळदरी त. नांदापूर, अनखळी, अंजनवाडी, अजरसोंडा, शिरडशहापूर, भोसी, जलालदाभा, येहळेगाव सोळंके, माथा, उखळी, जडगाव, पूर, सोनवाडी, जवळा बाजार, वसमत तालुक्यातील आरळ, किन्होळा, कुरुंदा, गिरगाव, हट्टा, आंबा, हयातनगर, पांगरा शिंदे, बाभूळगाव, अकोली, आसेगाव, परळी या गावांचा समावेश आहे.
नवीन ३३५ गावांचा आराखडा
जुनीच कामे झाली नसताना नवीन ३३५ गावांचा आराखडा सादर केला आहे. यात औंढा ६२, वसमत ७१, हिंगोली ७०, कळमनुरी ६६, सेनगाव ६६ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यासाठी ३२.७७ कोटी लागणार आहेत. यात स्वच्छ भारत मिशनला १९ कोटी, १५ व्या आयोग ७.५० कोटी तर एमआरईजीएसमध्ये ६.२५ कोटींचा भार उचलावा लागेल.