हिंगोली : जिल्हाभरात महावितरणच्या १ लाख ५५ हजार २२५ ग्राहकांकडे डिसेंबरअखेर १२४५४.३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकीत रक्कम भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असली तरी जिल्ह्यात ६५ हजार ३६८ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित असल्याचे समोर आले आहे. अशा ग्राहकांनी जुनी थकबाकी न भरताच त्याच नावाने अथवा दुसऱ्या नावाने वीज जोडणी घेतली आहे का हे पाहण्याचे निर्देश महावितरणने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्यात महावितरणचे एकूण २ लाख ३० हजार ४८० ग्राहक आहेत. त्यापैकी १ लाख ५५ हजार २२५ ग्राहकांकडे थकबाकी आहे. यात घरगुती ग्राहक १ लाख ४४ हजार ३४५, व्यावसायिक ६ हजार ३५०, लघू उद्योजक १ हजार ९०९, इतर ९९६, पाणीपुरवठा ५४५, पथदिवे १०८० या ग्राहकांचा समावेश आहे. यातील काही ग्राहक नियमित वीज बिल भरणा करणारे आहेत; मात्र तरीही महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या थकबाकी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे; मात्र जवळपास ६५ हजार ३६८ ग्राहकांनी वीज बिल भरणा करण्याचे सोडूनच दिले आहे. या ग्राहकांकडून वीज बिलाचा भरणा होत नसल्याने महावितरणने अशा ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. या ग्राहकांकडील थकीत रकमेचा आकडा आचंबित करणारा आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडे तब्बल ९६४०.६० कोटींची रक्कम थकीत असल्याचे समोर आले आहे. सध्या महावितरणने अशा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी जुनी थकबाकी न भरता नवीन जोडणी घेतली आहे का हे पाहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक
तालुका ग्राहकांची संख्या थकीत रक्कम (कोटीमध्ये)
औंढा नागनाथ १२३९१ २२७३.५१
वसमत १४०४१ २००१.४७
हिंगोली १४१९८ २१०६.३८
कळमनुरी ११६९७ १७१०.८५
सेनगाव १३०४१ १५४८.४०
एकूण ६५३६८ ९६४०.६०