विजेचा लपंडाव; ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:18+5:302021-04-01T04:30:18+5:30
गतिरोधक बनले धोकादायक हिंगोली : औंढा रोडवरील कयाधू नदी जवळील गतिरोधक धोकादायक बनले आहे. दुचाकीस्वार गतिरोधकाच्या बाजूने जात आहेत. ...

विजेचा लपंडाव; ग्राहक त्रस्त
गतिरोधक बनले धोकादायक
हिंगोली : औंढा रोडवरील कयाधू नदी जवळील गतिरोधक धोकादायक बनले आहे. दुचाकीस्वार गतिरोधकाच्या बाजूने जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मोठे वाहनांनाही हे गतिरोधक त्रासदायक असेच बनले आहे. संबंधितांनी लक्ष देऊन गतिरोधक नव्याने करावे, अशी मागणी होत आहे.
‘फुल पिकांना पाणी वेळेवर द्यावे’
हिंगोली : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन फूल उत्पादकांनी फुल पिकांना पाणी वेळेवर द्यावे. जेणेकरून फुले वाळणार नाहीत. विशेष म्हणजे मोगरा फुलांची तोडणी सकाळी लवकर करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.
चारा झाकून ठेवण्याचे आवाहन
हिंगोली : गत पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पशु पालकांनी जनावरांचा चारा हा सावलीच्या ठिकाणी नेऊन ठेवावा. चारा जास्त प्रमाणात वाळल्यास जनावरे चारा खात नाहीत. चाऱ्याबरोबर जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
वाडी-तांड्यांवर पाणीटंचाई
कळमनुरी : ग्रामीण भागातील वाडी-तांड्यांवर मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे हातपंप बंद पडले आहेत. जे काही चालू आहेत त्या ठिकाणी रांगा लागत आहेत. प्रशासनाने वाडी-तांड्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सरकारी दवाखान्यासमोर खड्डे
हिंगोली : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डे पडल्यामुळे रुग्णांना, तसेच नातेवाइकांना त्रास होत आहे. वेळोवेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाला सांगण्यात आले. परंतु, अद्याप तरी प्रशासनाने लक्ष दिले नाही. वरिष्ठांनी लक्ष देऊन खड्डे बुजविणे गरजेचे आहे.
‘भाजीपाला सुकणार नाही याची काळजी घ्यावी’
हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमान वाढू लागले आहे. विहिरीची पाणीपातळीही खोल गेली आहे. त्यामुळे भाजीपाल्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांनी पाण्यावाचून भाजीपाला सुकणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
नाल्या साफ नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले
आखाडा बाळापूर : गावातील अनेक वॉर्डांतील नाल्या साफ केल्या नाहीत. त्यामुळे जागोजागी डासांचे प्रमाण वाढले आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे गावात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.