रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:20+5:302021-03-19T04:28:20+5:30
‘तोफखाना येथील नाल्यांवर औषध टाका’ हिंगोली : शहरातील तोफखाना भागातील नाल्या साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले ...

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त
‘तोफखाना येथील नाल्यांवर औषध टाका’
हिंगोली : शहरातील तोफखाना भागातील नाल्या साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगर परिषदेने याची दखल घेऊन नाल्यांवर औषध फवारणी करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
वाडी-तांड्यावर पाणीटंचाई
शिरडशहापूर: औंढा तालुक्यातील शिरडशहापूर परिसरातील वाडी-तांड्यांवर मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांंना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबंधित विभागाने वेळीच वाडी-तांड्यावर पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.
हळद काढणीला सुरुवात
हिंगोली: तालुक्यातील सवड, केसापूर, देऊळगाव, वरुड आदी गावामध्ये मागील तीन-चार दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी हळद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने म्हणावा तेवढा उतारा आला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदर दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
वनविभागाचे दुुर्लक्ष
डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे व परिसरात मागील पंधरा दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. वेळोवेळी वनविभागाला सांगूनही अद्यापही कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. भाजीपाला तसेच इतर रबी पिकांची नासाडी वानरे करीत आहेत. वनविभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त
हिंगोली: येथील सामान्य रुग्णालयाच्या मुख्य गेटवरच खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास होत आहे. जिल्हा रुग्णालयाने याची दखल घेऊन मुख्य गेटवरील खड्डे बुजविणे गरजेचे झाले आहे.
‘मोक्याच्या जागी कचराकुंडी बसवा’
कळमनुरी: शहरातील मुख्य बाजरपेठेत कचराकुंडी नसल्यामुळे कचरा रस्त्याच्या कडेला साठविला जात आहे. परंतु, वाऱ्यामुळे हा साठवून ठेवलेला कचरा दुकानामध्ये जात आहे. नगर परिषदेने याची दखल घेऊन मोकळ्या जागी कचराकुंडी उभारावी, अशी मागणी नागरिक तसेच दुकानदारांनी नगर परिषदेकडे केली आहे.