३ कोटी १३ लाख ६० हजारांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:28 AM2021-03-06T04:28:56+5:302021-03-06T04:28:56+5:30
१२५ गावांमध्ये १४४ नवीन विंधन विहीर घेण्यासाठी ८९ लाख २८ हजारांचा आराखडा आहे. एप्रिल ते जूनदरम्यान ७६ गावांत ...
१२५ गावांमध्ये १४४ नवीन विंधन विहीर घेण्यासाठी ८९ लाख २८ हजारांचा आराखडा आहे. एप्रिल ते जूनदरम्यान ७६ गावांत ९८ विहीर व बोअरचे अधिग्रहणासाठी ५२ लाख ९२ हजार तसेच बीबगव्हाण, महालिंगी तांडा, पाणबुडी वस्ती, माळधावंडा, रामवाडी, हातमाली या ६ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १२ लाख ६ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, उपलब्ध जलस्रोत आटत चालले आहेत. मागील दोन वर्षांपासून अतिवृष्टी होत असल्याने तालुक्यातील भूजलपातळी वाढलेली आहे. भूजल पातळी वाढलेली असली तरीही सध्या कडक उन्हाळा जाणवत असून, उपलब्ध जलस्रोत आटत चालले आहेत. हातपंपाच्या पाणीपातळी खालावल्या जात आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची चाहूल बऱ्याच गावांत लागलेली आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत काही गावांत पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
सध्या तालुक्यातील काही हातपंप पाण्याअभावी, तर काही दुरुस्त्याभावी बंद आहेत. पंचायत समितीस्तरावर पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठ्याचे केशव सावंत यांनी दिली.
गावात पाणीटंचाई भासत असल्यास ग्रामपंचायतीने तसा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.