ताप, हिवताप व दमाचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST2021-02-14T04:27:37+5:302021-02-14T04:27:37+5:30
पाणवट्टे तयार करण्याची मागणी रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात वन विभागाची मोठी जमीन आहे. या वनामध्ये ...

ताप, हिवताप व दमाचे रुग्ण वाढले
पाणवट्टे तयार करण्याची मागणी
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात वन विभागाची मोठी जमीन आहे. या वनामध्ये निलगाय, रोही, रानडुकर, हरिण, मोर व इतर वन्य जनावरे आहेत. पण सध्या उन्हाळ्याची सुरूवात होत असल्याने या भागातील अनेक पाणीस्त्रोत कोरडे पडत आहे. यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. या वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पानवट्टे उभारण्यात यावे अशी मागणी वनप्रेमींतून होत आहे.
गावातील उकीरडा साफ करावे
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा जि.प. प्रशालेच्या पाठीमागून गावाचा मुख्य रस्ता गेलेला आहे. या रस्त्यावर नागरिकांनी केचकरचा टाकल्याने आता याठिकाणी मोठा उकीरडा निर्माण झाला आहे. यासाठी शाळेच्या पाठीमागे असणारा हा उकीरडा साफ करावा, अशी मागणी गावकऱ्यांसह पालक वर्गातून होत आहे.
उड्डाणपुलाचे काम संथगतीने
हिंगोली : शहरातील खटकाळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम मागील दीड वर्षापासून होत आहे. संथगतीने होणाऱ्या या पुलाच्या कामामुळे याठिकाणाहून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्ते उखडलेले असल्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी होत आहे. यासाठी या पूलाचे काम जलदगतीने व्हावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हरभरा काढणी अंतिम टप्प्यात
फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव शेतशिवारात हरभरा पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील हरभरा पिक काढले असून या पिकात कुठे घट तर कुठे वाढ झाली आहे. या पिकाची काढणी झाल्यानंतर बाजारपेठेत हरभरा पिकास चांगला भाव मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
महावितरणकडून वसुली मोहीम सुरू
हिंगोली : शासनाच्या आदेशानंतर शहरात महावितरण विभागाकडून वीजबिल वसुलीची मोहीम कडक करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकांनी वीजदेयके भरावीत म्हणून महावितरणचे कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जावून वसुली करीत आहेत. अनेक नागरिकांनी कोरोनामुळे मागील एक वर्षभराचे वीजबिल न भरल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांचे वसुलीचे काम वाढले आहे.
पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागेना
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावासह पिंपरखेड गावातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. गावात अंधार राहत असल्यामुळे रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या गावकऱ्यांना ठेसा लागत असल्याचे प्रकारही घडत आहेत. तसेच रस्त्यावरील खड्ड्यात पाय जावून गावकरी पडत असल्याचेही दिसत आहे. यामुळे गावातील पथदिवे दुरूस्त व्हावे अशी मागणी होत आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज
हिंगोली : शहरातील गांधी चौक, इंदिरा गांधी, इंदिरा खुले नाट्यगृह परिसरात मोठा कचरा जमा झालेला आहे. हा कचरा साफ करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्याची माेहीम राबविण्याची गरज असल्याची चर्चा शहरवासियांतून होत आहे. बऱ्याच ठिकाणी कचऱ्यामुळे दुर्गंधही पसरत आहे. यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
अल्पवयीन दुचाकीस्वार वाढले
हिंगोली : शहरात अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालवित असताना दिसून येत आहे. या दुचाकी चालकांचा शहरात आपले वाहन चालवितांना अनेकदा आपला वाहनावरील ताबा सुटत आहे. त्यामुळे शहरात अपघातांच्या संख्या वाढली आहे. या दुचाकीस्वरांमुळे अनेक सुज्ञ नागरिकांच्या वाहनांचा अपघात होत आहे. यामुळे वाहतूक शाखेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.