पालकांचे संमतीपत्र व ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:37+5:302021-01-24T04:13:37+5:30
पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १९ जानेवारी रोजी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या ...

पालकांचे संमतीपत्र व ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक
पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १९ जानेवारी रोजी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे मागील मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. १८ जानेवारी रोजी राज्य शासनाने परिपत्रक काढून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यासाठी सूचित केले आहे. या पत्राच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही शाळा सुरू करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शासनाने कोरोनाबाबत दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शासन निर्णय १५ जून, २९ ऑगस्ट व १० नोव्हेंबर, २०२० रोजीच्या परिपत्रकातील शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक शाळेतील वर्गखोल्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, सर्व शिक्षकांच्या कोरोनाबाबतच्या आरटीपीसीआर चाचण्या, कार्यगट गठीत करावे, शाळेत विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था करावी. शाळेत मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन व्हावे, यासाठी विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित कराव्यात. पालक संमती पत्र व ग्रामपंचायतचा ठराव घेणे बंधनकारक आहे. वर्गखोल्या स्वच्छ व सॅनिटाइज कराव्यात. या सर्व बाबींची काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव या कार्यालयात आपल्या अभिप्रायासह सादर करण्यात याव्यात. या कामी विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे पत्रही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे.