ऑक्सिजन,रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST2021-04-17T04:29:29+5:302021-04-17T04:29:29+5:30
ऑक्सिजनची सात टनाची मागणी हिंगोली जिल्ह्यातील सात शासकीय कोरोना हॉस्पिटलसाठी ऑक्सिजनची सात टनांची मागणी आहे. आज जिल्ह्यात टंचाई निर्माण ...

ऑक्सिजन,रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर !
ऑक्सिजनची सात टनाची मागणी
हिंगोली जिल्ह्यातील सात शासकीय कोरोना हॉस्पिटलसाठी ऑक्सिजनची सात टनांची मागणी आहे. आज जिल्ह्यात टंचाई निर्माण होण्याची भीती होती. मात्र, चार टन उपलब्ध झाला. सध्या हिंगोलीत दोन केंद्रांवर चार व तीन टन, वसमत तीन टन, कळमनुरी १ टन तर सिद्धेश्वर व कौठा येथे अर्धा टन ऑक्सिजन उपलब्ध आहे.
पुढे काय : आज रात्रीपर्यंत २७ टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असून तो मिळाल्यास आणखी चार दिवसांची निश्चिंती होणार आहे. तोपर्यंत नवी मागणीही करून ठेवलेली आहे.
रेमडेसिविर : मागणी पाच हजार, एकही मिळेना
सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जिल्हा सामान्य रुग्णालयातही जाणवत आहे. आज शेवटचे ८० इंजेक्शन वापरले. आता साठा संपला आहे. तीन कंपन्यांकडे प्रत्येकी पाच हजार इंजेक्शनची मागणी केली. मात्र, अजून पुरवठ्याबाबत संबंधितांकडून होकार आला नाही.
पुढे काय : राज्य शासनाशी पत्रव्यवहार करून जिल्ह्याला सध्याच्या गरजेनुसार आठवड्याला साडेतीन हजार इंजेक्शनची मागणी केली आहे.
लसीकरण : दोन दिवस पुरेल एवढाच साठा
जिल्ह्यात तब्बल ३९ केंद्रांवरून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ५४ हजार ३७६ लोकांना लस दिली. यापैकी १०६८६ जणांना दुसरा डोस दिला. जिल्हा स्तरावर हजार तर ग्रामीण भागात दोन हजार लसी उपलब्ध आहेत. सर्व ३९ केंद्रे सुरू आहेत. मात्र, पुरवठा न झाल्यास दोन दिवसांनी ते बंद पडतील.
पुढे काय : जिल्ह्याने किमान पाच हजार लसी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली असून दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.
पाठपुरावा सुरू
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा होण्यात अडचणी येत आहेत. मात्र, आम्ही सातत्याने पाठपुरावा करून तो मिळवत आहोत. त्यात खंड पडू नये, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी विविध स्टॉकीस्टसह तीन कंपन्यांशी थेट संपर्क सुरू आहे. आज रात्रीपर्यंत एखादी कंपनी किमान दोन हजार इंजेक्शनसाठी राजी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लसींचीही मागणी केली. पुरवठा वेळेत होत नसल्याने इंजेक्शनसाठी मात्र अडचणी येत आहेत.
- रूचेश जयवंशी, जिल्हाधिकारी