सीटीस्कॅन वारंवार केल्याने कर्करोगाचा धोका संभवतो; मात्र सध्या कोरोना रुग्णांना फारसा त्रास नसतानाही सीटीस्कॅन करायला लावले जात असल्याचे दिसत आहे. आरटीपीसीआर चाचणीतूनही आजाराची तीव्रता लक्षात येते; मात्र त्याकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. तर दुसरीकडे सीटीस्कॅनमध्ये फुफ्फुसाला किती बाधा झाली, हे कळत असले तरीही सामान्य रुग्णांनी ते काढले नाही तरीही चालते; मात्र त्यांनाही या फेऱ्यातून जावे लागते. अनेक जण आपला आजार किती बरा झाला, हे तपासण्यासाठी नंतरही खासगी सेंटरवर सीटीस्कॅन करीत आहेत. हिंगोली जिल्ह्यात यावर एम.डी. दर्जाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय सीटीस्कॅन करू नये, असे सांगितले तरीही हा गोरखधंदा सुरूच आहे. रोज जवळपास १०० ते १५० जणांचे सीटीस्कॅन होत आहे. तर शासकीयमध्ये याच्या निम्माही आकडा नाही. स्टेरॉईडही कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच वापरणेही घातक आहे; मात्र अनेक जण आजारातून लवकर बरे होण्याच्या नादात याचाही मारा करीत आहेत.
बुरशीजन्य आजाराचा धोका
स्टेराईड सुरुवातीच्या काळात देऊ नये. ते जास्त हानिकारक ठरू शकते. दुसऱ्या आठवड्यात विषाणू आणि शरीरात प्रातिकार करणाऱ्या सेलपासून तयार झालेले इंटरलिक्विड, सायटोसाईक्स यामुळे फुफ्फुसाला होणाऱ्या इजेपासून रोखण्यास मदत करू शकते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती कमी, आहार कमी, विषाणूचा हल्ला, ऑक्सिजन घेताना स्टराईल वॉटरचा न केलेला वापर बुरशीजन्य आजाराने निमंत्रण देतो.
रोज होतात १५० सीटीस्कॅन
कोरोनाच्या आगमनापूर्वी मोजकेच सीटीस्कॅन व्हायचे. आता रोज १५० पेक्षा जास्त सीटीस्कॅन होत आहेत. काही ठिकाणी तर तज्ज्ञ डॉक्टरांची चिठ्ठी नसतानाही सीटीस्कॅन करून दिला जात आहे. यासाठी दरही जास्त घेतले जात आहेत.
डिजिटल एक्सरेचा पर्याय असतानाही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय डॉक्टरही सीटीस्कॅनमध्ये थेट स्कोअरची नोंद असल्याने डोके लढवायची गरज उरत नसल्याने काही विचार न करता शिफारस करीत आहेत.
एक सीटीस्कॅन म्हणजे ८० ते १०० एक्सरेचा धोका
सीटीस्कॅनचे रेडिएशन हे ८० ते १०० एक्सरे इतके असते. त्यामुळे पुढे कर्करोगाचा धोका संभवतो. त्यामुळे ज्यांचा ॲन्टिजन, आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असताना दम लागतो, श्वसनाची अडचण होत असेल तरच एचआरसीटी केले पाहिजे, अन्यथा ही अनावश्यक बाब टाळणे गरजेचे आहे.
स्टेरॉईड व सीटीस्कॅनचा अतिमारा हा कोरोनाच्याच नव्हे, तर सामान्य रुग्णांनाही घातकच आहे. याचे अनेक दुष्परिणाम पुढे शरीरावर दिसून येतात. फंगल इन्फेक्शन अथवा कर्करोगासारख्या आजारांचा धोका संभवतो. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या बाबी कराव्यात.
-डॉ. गोपाल कदम, आरएमओ, जिल्हा रुग्णालय.