ना शाळा, ना परीक्षा; तरीही सव्वा दोन लाख विद्यार्थी पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:12+5:302021-06-23T04:20:12+5:30

हिंगाेली : कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षात शाळा भरल्याच नाहीत. ऑनलाईन अध्यापन झाले असले तरी शासनाने परीक्षा न घेण्याचा निर्णय ...

No school, no exams; Still a quarter of a million students pass! | ना शाळा, ना परीक्षा; तरीही सव्वा दोन लाख विद्यार्थी पास !

ना शाळा, ना परीक्षा; तरीही सव्वा दोन लाख विद्यार्थी पास !

हिंगाेली : कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षात शाळा भरल्याच नाहीत. ऑनलाईन अध्यापन झाले असले तरी शासनाने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील पहिली ते बारावीतील तब्बल २ लाख ३९ हजार ६४४ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाने मागील वर्षभरापासून शिरकाव केला आहे. दररोज रुग्ण वाढत असल्याने मागील पूर्ण शैक्षणिक वर्षात प्राथमिक शाळा भरल्या नाहीत. उच्च माध्यमिक शाळांचे वर्ग काही दिवसच सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता आले नाही. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारेच अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला. अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला असला तरी परीक्षा घेण्याचे आव्हान कायम होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला होता. रुग्णांचा मृत्यूही झाला. त्यामुळे राज्य शासनाने पहिली ते आठवी त्यानंतर नववी व अकरावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता त्यानंतर दहावी व बारावीच्याही परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २ लाख ३९ हजार ६४४ विद्यार्थी परीक्षा न देताच पास झाले आहेत.

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली - २२८५२

दुसरी - २३१८५

तिसरी - २२११२

चौथी - २१८७४

पाचवी -२१३४२

सहावी -२१०३४

सातवी -२०७४०

आठवी - २०५३५

नववी - १९५१९

दहावी - १९४०७

अकरावी - १२६५७

बारावी - १४३८७

ऑनलाईन शिक्षण

फायदे - ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर, लॅपटाॅप, टॅबलेट, स्मार्टफोन, इंटरनेट, झूम हाताळता येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना सहज समजू लागल्या आहेत, तसेच आई-वडिलांचा मुलांसाठी टिफीन देणे, लवकर तयार करणे आदी कामात बचत होत आहे.

तोटे - सकाळी लवकर झोपेतून उठण्याची सवय मोडत आहे. पालक व विद्यार्थी दिवसभर एकत्रच असल्याने सारखे नियंत्रणात राहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा येण्याची शक्यता असते. ऑनलाईन शिक्षणामुळे डोळ्यांचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरे - स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर सहज उपलब्ध होतो. शिक्षकही शहरी भागातच कुटुंबीयांसह राहत असल्याने त्यांचे मार्गदर्शनही घेणे सहज सोपे जाते. शैक्षणिक साहित्यासह इतर सुविधा सहज उपलब्ध होतात. इंटरनेटची अडचण जाणवत नाही.

खेडेगाव - स्मार्टफोन विकत घेतला तरी इंटरनेटची सर्वांत मोठी अडचण आहे. वेळेवर शैक्षणिक साहित्य, साधने सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागण्याची शक्यता असते. तांत्रिक अडचण आल्यास तज्ज्ञ वेळेवर उपलब्ध होत नाहीत.

जि.प. शाळा - ८७९

खासगी अनुदानित - २१८

खासगी विनाअनुदानित - ७३

Web Title: No school, no exams; Still a quarter of a million students pass!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.