ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग ; वाहक- चालकही विनामास्क !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:10+5:302021-06-23T04:20:10+5:30
रिॲलिटी चेक हिंगोली : कोरोना महामारी ही अजून पूर्णतः संपलेली नसतानाही चालक- वाहक मास्क कडे कानाडोळा करताना पहायला मिळत ...

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग ; वाहक- चालकही विनामास्क !
रिॲलिटी चेक
हिंगोली : कोरोना महामारी ही अजून पूर्णतः संपलेली नसतानाही चालक- वाहक मास्क कडे कानाडोळा करताना पहायला मिळत आहेत. प्रवाशांना मास्क शिवाय बसमध्ये घेऊ नये, अशी सूचना एसटी महामंडळाची असतानाही चालक- वाहक मास्क नसलेल्या प्रवाशांना आत घेत आहेत. त्यामुळे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना महामारी ओसरु लागताच राज्य शासनाने एसटी महामंडळाला बसेस सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत. आजमितीस ग्रामीण भाग वगळता पुणे, मुंबई, अहमदनगर, सांगली, अकोला, यवतमाळ, नागपूर आदी लांब पल्ल्यांच्या बसेस एसटी महामंडळाने सुरु केल्या आहेत. प्रवासादरम्यान चालक-वाहकांना मास्क नसेल तर त्यांची ड्युटी बंद करण्यात येईल, अशी सूचना दोन दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती, परंतु, जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील चालक-वाहक ‘कोरोना संपला’ या आर्विभावातच राहून बिनधास्तपणे प्रवाशांसोबत प्रवास करत आहेत. वाहकाने मास्क घालूनच तिकिटे फाडावीत . परंतु, मास्क न घालताच वाहक प्रवाशांची तिकिटे फाडत आहेत. चालकही मास्क न घालताच एसटी चालवत आहेत. हनवटीला मास्क लावून चालक-वाहक हे प्रवाशांसोबत प्रवास करताना पहायला मिळत आहेत. हिंगोली आगारातून सकाळी ९.५४ वाजता उमरखेड ते अहमदनगर ही बस सुटली. या बसमधील चालक-वाहकाने हिंगोली पासूनच औंढा नागनाथ, जवळा बाजार, हट्टा या गावापर्यंत मास्क घातलेला नव्हता. पुढे या दोघांनी मास्क घातला की नाही ? हे मात्र माहीत नाही.
दीड तासांच्या प्रवासात तीन वेळाच तोंडावर मास्क
कोरोना महामारीत मास्क घातल्याशिवाय प्रवास करु नये, असे जिल्हा प्रशासनाने सूचित केलेले असतानाही दीड तासांच्या प्रवासात तीन वेळा तरी तोंडावरील मास्क वाहकाने काढला होता. चालकाने तर हिंगोेेलीपासून हट्टा हे बसस्थानक येईपर्यंत तरी मास्क घातलेला आढळला नाही. बसमध्ये चढणाऱ्या एकाही प्रवाशाला वाहकाने मास्क का घातला नाही? याची विचारणा केली नाही. प्रवासी पण बिनधास्तपणे ‘कोरोना संपला’ या अर्विभावातच दिसत होते. हिंगोलीतून सुटलेल्या बसमध्ये २० प्रवाशांमध्ये ९ प्रवाशांनीच तोंडाला मास्क घातलेला होता.
‘लोकमत’ चा एसटी प्रवास
बस : उमरखेड ते अहमदनगर
वेळ : ९.५४
प्रवासी : २०
कुठल्या बसस्थानकावर किती चढले-उतरले
हिंगोली
ही बस निघाली तेव्हा ८ प्रवासी एसटी चढले. यात चौघांनाच मास्क होता. बाकी सहा प्रवासी नातेवाईकांना
सोडवायला आले होते. त्यांना मास्कही नव्हता. वाहकाने कोणत्याही प्रवाशांना मास्क का घातला नाही याची साधी विचारणाही केली नाही.
औंढा नागनाथ
येथे बस थांबली तेव्हा ८ प्रवासी उतरले. त्याचवेळी ७ प्रवासी लगेच बसमध्ये चढले. येथेही वाहकाने प्रवाशांना मास्कबाबत विचारणा केली नाही. खरे पाहिले तर वाहकाने प्रवाशांना मास्कबाबत विचारायला पाहिजे होते. पण तसे काही दिसले नाही.
जवळा बाजार
बाजारपेठेचे गाव म्हणून जवळा बाजारकडे पाहिले जाते. या बसस्थानकावर ५ प्रवासी उतरले आणि तीन प्रवासी चढले. १ प्रवासी सोडला तर इतर प्रवाशांनी मास्क घातलेला नव्हता. शहराच्या ठिकाणी कोरोना आहे, ग्रामीण भागात नाही, असे त्यांनाच वाटत असावे.
हट्टा
हट्टा हे छोटे बसस्थानक असून थोड्याच वेळ बस थांबते. येथे दोन प्रवासी उतरले. दोघांनाही मास्क होता. बस निघाली तेव्हा एक प्रवासी धावत येत होता. वाहकाने घंटी वाजविताच बस थांबली. यावेळेस एक प्रवासी बसमध्ये चढला. परंतु, त्याच्याही तोंडाला मास्क नव्हता. येथेही वाहकाने प्रवाशाला मास्कबाबत विचारणा केली नाही.
फोटो ४