सौर पथदिव्यांच्या बॅटऱ्या गायब
हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील बहुतांश गावांत समाजकल्याण विभागाच्यावतीने सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. विद्युत पुरवठा बंद झाला तरी गावात उजेड पडत होता; मात्र सौर दिव्यांच्या बॅटऱ्या गायब होत आहेत. बॅटऱ्या गायब होण्याचे प्रमाण वाढल्याने गावात अंधार पसरत आहे. याकडे लक्ष देऊन सौर पथदिव्यांच्या बॅटऱ्या चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
साईडपट्ट्या खचल्याने होताहेत अपघात
कळमनुरी: तालुक्यातून जाणाऱ्या हिंगोली ते नांदेड या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी साईडपट्ट्या खचल्या आहेत. वाहन रस्त्याच्या खाली उतरल्यास पुन्हा वाहन वर घेताना वाहनचालकांचे नियंत्रण सुटत आहे. यातून वाहन उलटण्याचे प्रमाण वाढत आहे. याकडे लक्ष देऊन साईडपट्ट्या भरण्यात याव्यात, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
पुलाचे कठडे गायब
कळमनुरी: तालुक्यातील माळेगाव ते आखाडा बाळापूर मार्गावरील ओढ्यावर पूल उभारण्यात आले आहेत; मात्र काही पुलाचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत. तर काही कठड्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावत आहे. याकडे लक्ष देऊन पुलास कठडे बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.