सर्व शाळा बंद असतानाही ‘निसर्गशाळा’ सुरूच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:20+5:302021-05-14T04:29:20+5:30
हिंगोली : शाळा म्हटले की, मुले अन् त्यांचा किलबिलाट आलाच. परंतु, कवी मनाच्या अण्णा जगताप यांनी काेराेना काळात मुलांना ...

सर्व शाळा बंद असतानाही ‘निसर्गशाळा’ सुरूच !
हिंगोली : शाळा म्हटले की, मुले अन् त्यांचा किलबिलाट आलाच. परंतु, कवी मनाच्या अण्णा जगताप यांनी काेराेना काळात मुलांना निर्सगाचे महत्त्व सांगण्यासाठी ‘ऑनलाईन निसर्गशाळा’ सुरू करून एक आगळा वेगळा नैसर्गिक उपक्रम विद्यार्थ्यांसमाेर ठेवला आहे.
‘एक मूल तीस झाडे’ या अभियानामार्फत ‘निसर्गशाळा’ उपक्रमात महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील १८५ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, सांगली, रत्नागिरी, अहमदनगर, यवतमाळ, बीड, लातूर, नांदेड, वाशिम, नागपूर अन् हिंगोली या जिल्ह्यांतील मुलांचा समावेश आहे. सर्व शाळा आजमितीस बंद असतानाही ‘ऑनलाईन निसर्गशाळा’ मात्र अविरतपणे सुरू आहे.
घरच्या घरी रोपवाटिका तयार करणाऱ्या जवळपास ५० विद्यार्थ्यांनी रोपवाटिका तयार करायला सुरुवात केली. या रोपवाटिकांना सहभागी मुलांचीच नावे दिली जातात, तसेच उल्लेखनीय काम कारणाऱ्या विद्यार्थ्यास ‘उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार’ दिला जातो. यामुळे ‘निसर्गशाळा’ मुलांना आवडू लागली आहे. सर्वच जिल्ह्यांतील मुले या उपक्रमात सहभागी होऊ लागली आहेत.
निसर्गशाळा आठवड्यातून एक दिवस ऑनलाईन भरवली जात असून, बाकीच्या दिवशी निसर्गामध्ये उतरून मुलांनी कृती करायची असते. या अभियानासाठी प्रा. ज्ञानोबा ढगे, रवी देशमुख, बाळू बुधवंत, बालासाहेब राऊत, विलास जाधव, राजा कदम, संजय मुसळे, प्रेमानंद शिंदे, अरुण वडजे, रतन आडे, श्याम राऊत हे सहकार्य करीत आहेत.
१४ वर्षांखालील मुलांच्या अंगी निसर्गाविषयी जाणिवा - नेणिवा तयार होऊन माती, पाणी, शेती, झाड, शेतकऱ्यांच्या विषयी प्रेम निर्माण व्हावे, हा मुख्य उद्देश ! मुलांचे नाते निसर्गाशी बालवयात घट्ट हाेते आणि पर्यावरणाचे संतुलन निर्माण होऊन मुले निरोगी जीवन जगू शकतात.
- अण्णा जगताप, निसर्गाची शाळा एक मूल, तीस झाडे अभियान
फोटो नंबर २४