पुन्हा अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळेही लॉकडाऊन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:10+5:302021-05-14T04:29:10+5:30
हिंगोली : गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडले आहे. यावर्षी तरी अक्षयतृतीया मुहूर्त हुकणार ...

पुन्हा अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळेही लॉकडाऊन !
हिंगोली : गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडले आहे. यावर्षी तरी अक्षयतृतीया मुहूर्त हुकणार नाही, असे अनेकांना वाटले होते. परंतु, गतवर्षीचीच पुनरावृत्ती यावर्षी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
गत दीड वर्षापासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. हे पाहून शासनाने संचारबंदी तसेच लाॅकडाऊन लागू केले आहे. लग्नसोहळे, मौज, धार्मिक विधी आदींना कोरोना नियम पाळण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. मंगल कार्यालयांनी १५ वऱ्हाडींपेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी जमा करू नयेत. मंडपात आलेल्या प्रत्येक मंडळींनी मास्क घातलाच पाहिजे, असेही प्रशासनाने सूचित केले आहे. कोरोनाचे नियम न पाळल्यास नियमाप्रमाणे दंडही भरावा लागेल, असेही सूचित केले आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यात ८, मे महिन्यात १६ आणि जून महिन्यात ८ लग्नाचे मुहूर्त आहेत. मे महिन्यातील मुहूर्त तर केव्हाच कोरोनामुळे हातून गेले आहेत. अक्षय तृतीया मुहूर्तापर्यंत तरी लॉकडाऊन संपेल असे वाटले होते. परंतु, हा मुहूर्तही लॉकडाऊनमुळे हुकला आहे.
मे महिन्यात १६ मुहूर्त....
मे महिन्यात एकूण १६ मुहूर्त होते. हे मुहूर्तही कोरोना महामारीने हिसकावून घेेतले आहेत. आता जून महिन्यातील मुहूर्तांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती संतोष गुरु अगस्ती यांनी दिली.
नियमांचे पालन करणे आवश्यक....
कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे. विनाकारण आणि विनामास्क गर्दीत प्रवेश करू नये. लग्नसोहळे व इतर धार्मिक कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उरकून घ्यावेत.
आनंदोत्सवला कोरोनाचे नियम आडवे....
कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडविला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. अक्षयतृतीया मुहूर्त चांगला असल्यामुळे अनेकांनी लग्नांची तिथीही काढली आहे. कोरोनाआधी विवाहसमारंभात आनंदोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. यावेळेस कोरोनाचे नियम आडवे आल्याचे वधू-वरांच्या पित्याने सांगितले.
कोरोनामुळे मंगल कार्यालयांनाही फटका...
विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळी येत आहेत. परंतु, कोरोना महामारी आणि किचकट नियमांमुळे मंगल कार्यालयांचे चालक नोंदणीच करीत नाहीत. कोरोनाचे नियम हे न परवडण्यासारखे आहेत. एकंदर पाहिले तर मंगल कार्यालयांना कोरोनामुळे फटकाच बसला आहे.
-निश्चल एंबल, अध्यक्ष, महावीर भवन, हिंगोली.