अल्पवयीन मुली ‘लॉक’; बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:07+5:302021-06-27T04:20:07+5:30
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यांच्या वतीने मार्च २०२० पासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्हा हद्दीच्या ...

अल्पवयीन मुली ‘लॉक’; बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले!
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यांच्या वतीने मार्च २०२० पासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्हा हद्दीच्या बाहेर कोणालाही जाता येत नव्हते. या काळात लहानापासून ते थोरापर्यंत तसेच अल्पवयीन मुलीसह सर्वचजण घरात अडकून पडले होते. मध्यंतरी काही दिवस निर्बंध शिथिल करण्यात आल्याने या काळात १७ मुली तर २०२१ मध्येही सुरुवातीचे तीन महिने निर्बंध शिथिल असल्यानेही या काळात १३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी अपहरण झाल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी पथकाला कामाला लावले आहे. दोन महिन्यापूर्वीच हिंगोलीतील एका अल्पवयीन मुलीचा काही तासातच शोध घेऊन पालकाच्या स्वाधीन केले होते.
अडीच वर्षांत ५६ पैकी ४७ बेपत्ता मुलींचा शोध लावण्यात यश
२०१९ मध्ये जिल्ह्यात २६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी तब्बल २५ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. तर केवळ एका मुलीचा शोध लावणे बाकी आहे. २०२० मध्ये १७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी पोलिसांनी १५ अल्पवयीन मुलींचा शोध लावला. तर दोन मुली अद्याप बेपत्ता आहेत. तसेच २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत १३ अल्पवयीन मुली बेपत्ता असून यापैकी ७ मुलीना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर ६ अल्पवयीन मुलींचा शोध लावण्यासाठी पोलिसांचे पथक कामाला लावले आहे.
अंमलदारांसह सायबरसेलचे पथक कामाला
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली तर तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. यातून एखादा धागा हाती लागला की शोध घेणे सुलभ होते. बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध सायबर सेलच्या मदतीने तपास अंमलदार घेत आहेत. तसेच नातेवाईकांनाही अल्पवयीन मुलीबाबतची माहिती वेळीच पोलिसांना दिल्यास अल्पवयीन मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना मदत होईल.
बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासंदर्भात तपास अंमलदारांसह सायबर सेलच्या पथकाला सूचना दिल्या आहेत. पालकांनीही घरात विश्वासाचे, आपलेपणाचे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. तसेच आपला पाल्य काय करतोय, याकडे लक्ष दिल्यास अशा घटना टाळता येतील.
-यशवंत काळे, प्रभारी पोलीस अधीक्षक, हिंगाेली