वापरलेले मास्क यंत्रामार्फत केले जातात नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST2021-04-14T04:27:08+5:302021-04-14T04:27:08+5:30
हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजविला आहे. स्वच्छता बाळगा, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना नगर परिषद देत ...

वापरलेले मास्क यंत्रामार्फत केले जातात नष्ट
हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजविला आहे. स्वच्छता बाळगा, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना नगर परिषद देत असली तरी अनेकजण मात्र नियमांकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. असे असले तरी नगर परिषद मात्र दोन वर्षांपासून कचऱ्यातील मास्क एकत्र करून ते यंत्राद्वारे जाळून टाकण्याचे काम करीत आहे.
हिंगोली शहराची लोकसंख्या आजमितीस दीड लाखांच्या घरात आहे. दररोज शहरातून ३० टन कचरा निघत असतो. यामध्ये सुका कचरा १२.३१ टन, तर ओला कचरा १२.२ टन रोज निघत असतो. कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर त्यातून मास्क बाजूला काढले जातात. ही प्रक्रिया २३ मार्च २०२० पासून आजतागायत नित्याने सुरू आहे. कचऱ्यातील मास्क बाजूला काढण्याचे काम तीन कर्मचाऱ्यांकडे नगर परिषदेने सोपविले आहे. यासाठी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर हे स्वत: लक्ष देऊन काम करवून घेतात. कोरोनाने गतवर्षी सर्वत्र शिरकाव केला. त्याच वेळी नगर परिषदेने इन्सीरेशन मशीन (भस्मीकरण यंत्र) विकत घेतले आहे. तेव्हापासून आजतागायत मास्क यंत्रात टाकून जाळण्याचे काम केले जाते.
प्रतिक्रिया
गत दोन वर्षांपासून कोरोनाचे रुग्ण खूप आढळून येत आहेत. तेव्हा नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर नियमितपणे करावा. वापरलेले मास्क व सॅनिटायझर बॉटल इतरत्र न टाकता कचराकुंडीत टाकावी, जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होणार नाही.
- सनोबर तसमीम, कनिष्ठ अभियंता, नगर परिषद
बॉक्स
दररोजच्या कचऱ्यातील मास्कचे काय?
दररोजचा कचरा एकत्र कचराकुंडीत पडत असला तरी त्याचे वर्गीकरण केले जाते. कचऱ्यात पडलेले मास्क बाजूला काढण्यासाठी नगर परिषदेने चेतन बुजगावणे, दिनकर शिंदे, रवी गायकवाड या तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यानंतर मास्क यंत्राच्या साह्याने जाळले जातात.
बॉक्स
रुग्णालयातील कचऱ्याचे काय केले जाते?
रुग्णालयातील औषधी बॉटल, प्लास्टिक कचरा एकत्र साचला जात असला तरी त्यातून मास्क बाजूला काढून ते जाळले जातात. नगर परिषदेची घंटागाडी नियमीत येते. त्यामुळे कचरा टाकण्यास सोयीस्कर होते. ज्यावेळेस घंटागाडी उशिरा येते त्या वेळेस कचऱ्याची दुर्गंधी सुटणार नाही, याची खबरदारी घेतली जाते, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
शहरात रोज निघणारा कचरा-३० टन
१६.२ टन ओला कचरा
१२.३१ टन सुका कचरा