विवाह, सत्यनारायणापासून तेराव्यापर्यंत ऑनलाइन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:20 AM2021-06-23T04:20:06+5:302021-06-23T04:20:06+5:30
हिंगोली : कोरोना महामारी अजूनही कमी झालेली नाही. हे पाहून शासनाने तीन - चार महिन्यांपासून धार्मिक विधी तसेच विवाह ...
हिंगोली : कोरोना महामारी अजूनही कमी झालेली नाही. हे पाहून शासनाने तीन - चार महिन्यांपासून धार्मिक विधी तसेच विवाह समारंभाला काही नियम घातले आहेत. आजमितीस छोटे जिल्हे वगळता इतर मोठ्या जिल्ह्यांमध्ये विवाह, सत्यनारायण पूजेपासून तेराव्याचे कायर्यक्रम हे ऑनलाइन झाले आहेत.
कोरोनामुळे राज्य शासनाने धार्मिक कार्यक्रमांना अजूनही सार्वजनिकरीत्या परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर आदी मोठ्या शहरांत धार्मिक कार्यक्रम हे ऑनलाइन होत आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत तरी कोणतेच कार्यक्रम ऑनलाइन सुरू नाहीत. कोरोनाचे नियम पाळत पुरोहित मंडळी सत्यनारायण, उदकशांती, सत्यअंबा, गृहप्रवेश आदी कार्यक्रम यजमानांना बोलावून कमी लोकांमध्ये आटोपून घेत आहेत.
कोरोना महामारी ओसरत चालली असला तरी रुग्ण हे वरचेवर आढळून येत आहेत. त्यामुळे पूजा-पाठ सांगते वेळेस पुरोहित मास्क घालूनच पूजा सांगत आहेत. जे यजमान पूजेला बसत आहेत, त्यांनाही पुरोहित मास्क घालण्याच्या सूचना करून विधी सांगताना दिसत आहेत.
प्रतिक्रिया- बॉक्स
मोठे शहर वगळता छोट्या शहरात ऑफलाइन
शासनाने सार्वजनिकरीत्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. मोठ्या शहरात वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे यजमान हे पुरोहितांकडून ऑनलाइन कार्यक्रम करून घेत आहेत. त्याप्रमाणे पुरोहित हे ऑनलाइन पूजापाठ सांगण्यास सुरुवात करीत आहेत.
पूजेला आले तरी मास्क
राज्य शासनाने धार्मिक विधींना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पुरोहित मंडळी स्वत: मास्क घालून पूजा ऐकायला आलेल्या मंडळींनाही मास्कचे बंधन घालत आहेत. पूजेसाठी येणाऱ्या मंडळींनी प्रवेशद्वारात ठेवलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ करून आत प्रवेश करण्यास सांगितले जात आहे. लहान असो किंवा मोठे सर्वांना मास्क आवश्यक आहे.
काय म्हणतात विधी करणारे...
राज्य शासनाने धार्मिक विधींना अजूनही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सत्यनारायण, अभिषेक, उदकशांती, गृहप्रवेश आदी छोटे-मोठे कार्यक्रम घेण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. शासनाने परवानगी देणे गरजेचे आहे.
- रेणुकादासराव कुलकर्णी, पुरोहित
जिल्ह्यातील काही पुरोहितांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे सत्यनारायण, अभिषेक आदी कार्यक्रम आहेत. गत दीड वर्षापासून हे सर्वच धार्मिक कार्मक्रम बंद आहेत. पुरोहितांचा राज्य शासनाने विचार करावा.
- संतोष अगस्ती, पुरोहित