मंडईत लिंबू वगळता सर्वच भाज्या दहा रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST2021-03-29T04:17:41+5:302021-03-29T04:17:41+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रविवारी ...

मंडईत लिंबू वगळता सर्वच भाज्या दहा रुपये किलो
जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रविवारी भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला विक्रेत्यांची धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. वांगे, पानकोबी, फुलकोबी, गाजर, मेथी, काकडी, आलू या भाज्या ३० रुपये किलोच्या खाली कधी आल्या नव्हत्या; परंतु आवक चांगली असली तरी संचारबंदीमुळे सर्वच भाज्या या १० रुपये किलो प्रमाणे विकल्या गेल्या.
सात दिवस संचारबंदीत भाजी मिळेल की नाही, या भीतीने ग्राहकांनी सकाळपासून दुपारी ४ वाजेपर्यंत भाजी मंडईमध्ये गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे ठोक विक्रेत्यांकडून घेतलेल्या भाज्या संचारबंदीत घरामध्ये सडून जातील या भीतीने किरकोळ भाजी विक्रेत्यांनी सर्वच भाज्या १० रुपयांप्रमाणे विकल्या. लिंबाची मात्र आवक कमीच होती. त्यामुळे लिंबू हे ५० रुपये किलोप्रमाणे विकले गेल्याचे बाजारात पाहायला मिळाले.
किराणा बाजारातील चढ-उतार
रविवारी किराणा बाजारात शेंगदाणा ११०, तूरडाळ १००, मसूरडाळ ८०, हरभराडाळ ७०, मूगडाळ १००, गूळ ४० रुपये, साखर ३५ तर तांदूळ ४० रुपये किलोने विक्री झाले. सोयाबीन तेल मागच्या वेळेस १२५ रुपये विकले गेले. या आठवड्यात १३० रुपये भाव होता.