लॉकडाऊनमुळे दीड कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:08+5:302021-05-14T04:29:08+5:30
हिंगोली : कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका सराफा बाजाराला जास्त प्रमाणात बसला असून, दीड वर्षापासून जवळपास दीड कोटीची ...

लॉकडाऊनमुळे दीड कोटींची उलाढाल ठप्प
हिंगोली : कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका सराफा बाजाराला जास्त प्रमाणात बसला असून, दीड वर्षापासून जवळपास दीड कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे हाताला काम नसल्यामुळे बंगाली कारागीरांनीही आपले घर जवळ केले आहे.
२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केला. आज दीड वर्ष झाले, तरी कोरोना महामारी संपुष्टात येण्याचे नाव घेत नाही. कोरोना रुग्ण वाढत असल्याचे पाहून शासन वेळोवेळी लॉकडाऊन, संचारबंदी लागू करीत आहे. दरवर्षी नाही म्हटले तरी एक ते दीड कोटींची उलाढाल हिंगोली जिल्ह्यात होत असते. मराठवाड्यातील क्रमांक एकची सोन्याची बाजारपेठ म्हणून हिंगोली जिल्ह्याकडे पाहिले जाते. परंतु, कोरोनामुळे आज सराफा बाजार पूर्णत: बंद झाला आहे. जिल्ह्यात १५०, तर शहरात ५० दुकाने सराफांची आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने आजमितीस बंद आहेत. गतवर्षी शासनाने कोरोना काळात थोडीबहुत सूट दिली होती. परंतु, यावेळेस मात्र दुकाने उघडण्यासाठी अजिबात सूट दिलेली नाही. आमचा लॉकडाऊनला विरोध नाही; पण दुकानांनाही काही प्रमाणात का होईना दुकाने उघडण्यास सूट दिल्यास कारागीरांच्या हाताला काम मिळते. आजमितीस नाही म्हटले तरी जवळपास ३०० कारागीरांची संख्या आहे. परंतु, हाताला काम नसल्यामुळे बंगाली, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर या भागांतून आलेल्या कारागीरांनी घर जवळ केले आहे.
अक्षय तृतीयाचा मुहूर्त गेला...
साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा मुहूर्तही पूर्णत: हातून गेला आहे. अक्षय तृतीयेला मौल्यवान वस्तू घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पण कोरोनामुळे दुकाने बंद असल्यामुळे त्यावर पाणी फेरले गेले आहे. मोठ्या शहरात सोन्या-चांदीची ऑनलाईन नोंदणी होते. हिंगोली जिल्हा सोने-चांदीबाबत मराठवाड्यात अव्वल असला, तरी ऑंनलाईन नोंदणी मात्र झालेली नाही.
- सुधीरअप्पा सराफा, अध्यक्ष, सराफा असोसिएशन
कारागीरांवर उपासमार...
सोन्या-चांदीचे दागिने बनविणाऱ्या कारागीरांवर दीड वर्षापासून उपासमार येऊन ठेपली आहे. सराफा दुकाने बंद असल्यामुळे अनेकांनी घर जवळ केले आहे. बंगाली कारागीर तर केव्हाच निघून गेले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतरच ते आता परत येतील. दोन पिढ्यांपासून अशी वेळ कधीच आली नसून, कोरोनामुळे आज उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने दुकानांना परवानगी दिल्यास रोजीरोटीचा प्रश्न मिटू शकतो.
- दुर्गादास खर्जुले, सराफा कारागीर