विलगीकरणाच्या भीतीने रुग्णालयाच्या छतावरून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:24+5:302021-05-14T04:29:24+5:30
हिंगोली जिल्हा रुग्णालयात हिंगोली तालुक्यातील समगा येथील वैभव दिवाकर सरकटे (वय २४) या युवकाचे आजोबा कोरोनाबाधित असल्याने दाखल आहेत. ...

विलगीकरणाच्या भीतीने रुग्णालयाच्या छतावरून उडी
हिंगोली जिल्हा रुग्णालयात हिंगोली तालुक्यातील समगा येथील वैभव दिवाकर सरकटे (वय २४) या युवकाचे आजोबा कोरोनाबाधित असल्याने दाखल आहेत. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. जिल्हाधिकारी आले की, रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेर काढून विलगीकरण केंद्रात पाठविले जाते. आजही तशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे नातेवाइकांची एकच धांदल उडाली. अनेक जणांनी लपण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्वांना शोधून विलगीकरण केंद्रात पाठविण्याचा आदेश जयवंशी यांनी दिला. मात्र, या काळात वैभव सरकटे हा रुग्णालयाच्या छतावर गेला. तेथून दुसऱ्या मजल्यावरून ऑक्सिजन टँकनजीकच्या भागात खाली उडी घेतली. यात त्याचे दोन्ही हात, पाय मोडले आहेत. शिवाय शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोक्याला इजा झाली आहे. दरम्यान, येथे आढळलेल्या रुग्णांच्या चार नातेवाइकांना लिंबाळा क्वारंटाईनला पाठविले.
जखमी वैभववर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात उपचार सुरू आहेत. डॉ. मंगेश टेहरे, डॉ. कुटे, डॉ. फैसल खान, डॉ. गोपाल कदम, आदींनी उपचार केले. या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकारामुळे नातेवाइकांना कोरोना वाॅर्डात प्रवेश देण्याचा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनीही भेट दिली. रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री साडेसातच्या सुमारास त्याला नांदेडला हलविण्यात येत होते.
या प्रकाराची चौकशी केली जाईल : जिल्हाधिकारी
मी येण्यापूर्वीच येथे एकजण छतावरून पडल्याचे आम्हाला कळाले. त्यानंतर आम्ही त्याला उपचारासाठी अपघात विभागात हलविले. तो पडला की उडी घेतली हे कळाले नाही. त्याचा शोध घेतला जाईल. मात्र, नातेवाइकांना रुग्णालयात प्रवेश दिला जाणार नाही. या ठिकाणी प्रत्येक वाॅर्डात चार परिचारिका व दोन वॉर्डबॉय नेमले. रुग्णांच्या नातेवाइकांच्या आरोग्याचाही प्रश्न आहे. हा संसर्गजन्य आजार आहे. शिवाय हे नातेवाईक बाहेरही फिरतात. त्यामुळे हिंगोलीकरांनीही नातेवाईक येणार नाहीत, असे आवाहन करावे, असे ते म्हणाले.
या ठिकाणी खासगी व पोलिसांची मोठी सुरक्षा असताना नातेवाईक वर जातात कसे? अशी विचारणा केली असता आता पोलिसांसाठी येथे नवीन केबिन दिली आहे, यापुढे पोलिसांच्या नजरेतून कोणी जाणार नाही. यापूर्वी नजर चुकवून अनेकजण जात होते. त्यांना क्वारंटाईनही केले. यापुढे जर नातेवाईक आत गेल्याचे आढळले तर डॉक्टर, पोलीस यांच्यावर कारवाई करू, असा इशाराही दिला. तसेच खासगी सुरक्षा रक्षकांची सेवा देणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा दिला.