लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा आदेश शासनाने काढल्यानंतरही त्याचा लाभ मात्र कुणाला मिळाला याचे काहीच गणित दिसत नाही. कदाचित पूर्वीचीच रक्कम मिळाली नसल्याने अनेकांनी नव्या निर्णयाचा लाभच घेतला नसल्याचे चित्र आहे.१0 आॅगस्ट २0१८ रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या शासन निर्णयात कर्जमाफीच्या निर्णयात अंशत: बदल करून त्याची व्याप्ती वाढविली होती. यात सुरुवातीला दीड लाख मर्यादेपर्यंत ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्यांना प्रत्येक पात्र कुटुंबातील एका सदस्याला कर्जमाफी दिली होती. तर यापेक्षा जास्त कर्ज असल्यास त्यापुढील रक्कम भरूनही लाभ घेता येणार होता. मात्र नव्या निर्णयानंतर त्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्यासही दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देता येणार आहे. त्यासाठी संबंधितांना कसा लाभ द्यावा हे उदाहरणासह परिशिष्ट अमध्ये नमूद केले आहे. जर थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड योजनेच्या लाभासाठी दीड लाखांवरील रक्कम भरून लाभ घेतला तर ती शासनाकडून परत करण्यात येईल, असे म्हटले होते. तर थकबाकी दीड लाखांच्या आत असल्यास आणि लागू असेल तेथे अशा सदस्यांकडील पुनर्गठित कर्जाची उर्वरित हप्त्यांच्या देय असलेल्या रकमेसह दीड लाखाच्या मर्यादेत लाभ देता येईल, असेही स्पष्टपणे म्हटले होते. तर अशा खातेदारांची नावे ज्या अर्जात असतील त्यात लाभार्थी क्रमांक एक व दोनबाबत कर्जमाफीचा लाभ देताना कोणती व कशी काळजी घ्यायची याची गणितीय माहितीही उदाहरणादाखल दिली. तरीही हिंगोली जिल्ह्यात अद्याप नव्या निकषाप्रमाणे कोणाला लाभ मिळाल्याचे चित्र दिसत नाही. यामागे नेमके कारण काय? हे न उलगडणारे कोडे आहे.कर्जमाफीच्या योजनेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१७५८ लाभार्थ्यांना २७.४१ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकेच्या ३७१७८ जणांना १९२.११ कोटी, तर ग्रामीण बँकेच्या ८९६१ जणांना ४९.८९ कोटी अशा २६९ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. यापैकी ६२ हजार ११६ शेतकºयांच्या खात्यावर २४८.३४ कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचे बँकांकडून उपनिबंधक कार्यालयात सांगण्यात आले. यात जिमसचे २२.४६ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांचे १८९ कोटी तर ग्रामीण बँकांचे ३६.११ कोटी रुपये खात्यावर जमा झाले आहेत.अजूनही ५७८१ जणांचे २१.0८ कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा करावयाचे बाकी आहेत. यात जिमसचे ३२४७, राष्ट्रीयीकृत बँकांचे २७८ तर ग्रामीण बँकेचे जवळपास २२५६ खातेदार आहेत. ग्रामीण बँकेच्या २५ टक्के लाभार्थ्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे.
वाढीव कर्जमाफी अजूनही बासनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:30 IST