शिरड शहापूर येथील गंगाधर बबनराव सूर्यतळ या व्यापाऱ्याने २६ ऑगस्ट रोजी हिंगोली येथील नवीन मोंढ्यातून २० टन हळदीने भरलेला ट्रक राजस्थानमधील व्यापारी संजय मीना यांच्याकडे पाठविला होता. यासाठी त्यांचा फोनवरूनच ऑनलाइन व्यवहार झाला होता. या हळदीची किंमत १४ लाख २० हजार रुपये एवढी होते, तर मीना यांनी ४ लाख रुपये सूर्यतळ यांना अदा केले होते. उर्वरित १०.२० लाख रुपये अदा झाल्यानंतर कोटा येथे ट्रक खाली करण्याचे ठरले होते. मात्र, २८ ऑगस्ट रोजी ट्रक तेथे पोहोचल्यानंतर ट्रक मालक देविसिंग परिहार रा.पिंपला मंडी, जिल्हा मनसोर, राज्य राजस्थान व ट्रक चालक पुखराज थानेरा, हरिसिंग चंदेल यांनी संगनमत करून ट्रक खाली करून घेतला. त्यानंतर, सूर्यतळ यांनाही ही मंडळी दाद देत नसल्याचे सूर्यतळ यांनी सांगितले.
यात आपला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने, सूर्यतळ यांनी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पुखराज थानेरा, हरिसिंग चंदेल, देविसिंग परिहार, संजय मीना या चार जणांवर क.४०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार देशमुख या करणार आहेत.