विनामास्क फिरणाऱ्या २४ जणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST2021-03-05T04:29:48+5:302021-03-05T04:29:48+5:30
हिंगोली: संचारबंदीच्या काळात काम नसताना रस्त्याने मास्क न लावता फिरणाऱ्या २४ जणांना महागात पडले. ही कार्यवाही शहरातील सहा नगरामध्ये ...

विनामास्क फिरणाऱ्या २४ जणांना दंड
हिंगोली: संचारबंदीच्या काळात काम नसताना रस्त्याने मास्क न लावता फिरणाऱ्या २४ जणांना महागात पडले. ही कार्यवाही शहरातील सहा नगरामध्ये करण्यात आली.
२० फेब्रुवारीपासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे मास्क न घालणाऱ्याविरुद्ध नगर परिषद व पोलीस विभागाच्या वतीने संयुक्तिक कार्यवाही करण्यात येत आहे. गत चार दिवसांपासून टाळेबंदी लागू केली आहे. तरीही काही जण बिनधास्तपणे रस्त्याने फिरत आहेत. शहरातील अग्रसेन चौक, इंदिरा चौक, हनुमाननगर, आरामशीन लाईन, पेन्शनपुरा, गवळीपुरा आदी नगरातील रस्त्यांवर विनामास्क फिरणाऱ्या २४ जणांना पकडून त्यांच्याकडून दंडापोटी ४ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याचबरोबर शहरातील तीन किराणा दुकानदारांंना दुकाने उघडे ठेवल्याबद्दल त्यांना ५ हजारांचा दंड भरण्यास भाग पाडले. ही कार्यवाही मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. के. राठोड, पंडित मस्के, प्रवीण चव्हाण, नागेश नरवाडे आदी कर्मचाऱ्यांनी काम केले.
टीम दोन अन् फिरणारे जास्त
नगर परिषद व पोलीस विभागाच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यांना दंड लावण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या टीम दोन असल्या तरी फिरणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. छुप्या मार्गाने काही जण रस्त्याने फिरताना दिसून येत आहेत. तेव्हा नगर परिषदेने अजून एका टीमची स्थापना करणे गरजेचे आहे.