कुंभार समाजाचे १५ कुटुंबे उपासमारीला जातात सामोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST2021-04-04T04:30:40+5:302021-04-04T04:30:40+5:30

हिंगोली : उन्हाळ्याचे तीनच महिने कुंभार समाजाला उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचे असतात. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी केली आहे. ...

Fifteen families of the potter community go hungry | कुंभार समाजाचे १५ कुटुंबे उपासमारीला जातात सामोरे

कुंभार समाजाचे १५ कुटुंबे उपासमारीला जातात सामोरे

हिंगोली : उन्हाळ्याचे तीनच महिने कुंभार समाजाला उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचे असतात. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी केली आहे. याचा सर्वाधिक फटका कुंभार समाजाला बसल्याची व्यथा कुंभार व्यावसायिकांनी मांडली. सद्य:स्थितीत कुंभार समाजाचे १५ कुटुंबे उपासमारीला सामोरे जात आहेत.

जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्च आणि २६ मार्च ते ४ एप्रिल अशी दोनवेळा टाळेबंदी केली आहे. टाळेबंदीला कुंभार समाजाचा विरोध नाही. परंतु, माठांचा व्यवसाय फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असा तीनच महिने चालत असल्याने तोही सद्य:स्थितीत बंदच आहे. गल्ली, वाॅर्डातही जावून माठ विकणे अवघड जाते. त्यामुळे दरवर्षी शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी कुंभार समाज माठांची विक्री करतो. परंतु, गत दोन वर्षांपासून माठांची विक्री होत नाही. परिणामी उपासमारीला कुंभार समाज तोंड देत आहे. हिंगोली शहरातील गवळीपुरा येथे जवळपास १५ कुटुंबांकडे पिढीजात माठांचा व्यावसाय आहे. यावरच कुटुंबाचा गाडा चालतो. या कुटुंबात ३५ ते ४० लहान-लहान लेकरे आहेत. दिवसाकाठी माठ विक्रीतून चारशे रुपये पदरात पडायचे तेही आता पडेनासे झाले आहेत.

२३ मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केला. त्यावेळेसपासूनच कुंभार समाजाची उपासमार सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यापासून माठांची बुकींग होत असते. परंतु, यावेळेस कोरोनामुळे बुकींगही झाली नाही. घर शोधत कोणताही ग्राहक आमच्याकडे येत नाही. त्यामुळे आम्हाला चौकामध्ये किंवा वर्दळीच्या रस्त्यावर माठ विकावे लागतात. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रस्त्यावर बसणेही कठीण झाले आहे. मोठी माणसे उपाशी राहू शकतात. परंतु, लहान मुलांना ते शक्य नाही. लेकरे उपाशीपोटी झोपलेली पहावेसे वाटत नाही, अशीही प्रतिक्रिया कुंभार समाजाने व्यक्त केली.

माठांची केली उतरंड.....

माठ तयार करूनही काही उपयोग होत नाही. विक्रीच बंद असल्याने घरात, दारात उतरंड करावी लागत आहे. गवळीपुरा शहराचा जुना भाग आहे. या ठिकाणी कुंभार समाजाची पंधरा ते वीस घरे आहेत. पाच पिढ्यांपासून आम्ही हाच व्यवसाय करत आलो आहोत. हिंगोली शहरासह अकोला, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणी कुंभारमंडळी दोन पैसे मिळावेत म्हणून माठ विक्रीसाठी घेऊन जातात. परंतु, कोरोना संसर्ग वाढल्याने परजिल्ह्यांत जाता येत नाही. तेव्हा शासनाने कुंभारांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ज्ञानेश्वर पेरीया, गोपाल पेरीया, राधेश्याम पेरीया, नंदू पेरीया, गणेश पेरीया, प्रकाश पेरीया, सचिन बनचरे यांनी शासनाकडे केली आहे.

फोटो नंबर ७

Web Title: Fifteen families of the potter community go hungry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.