- दिलीप कावरखेगोरेगाव (जि. हिंगोली) : ‘मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी परक्याचे धन’ असे म्हटले जाते. पण, या बुरसट वाक्प्रचाराला बाजूला सारून अक्षराने एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन एकरांत सोयाबीन लागवड करून दाखवत शेतकरी वडिलाला मोठा आधार दिला. यामुळे मुलीही काही कमी नसतात, हे यातून स्पष्ट होते.
काळ बदलला असल्यामुळे आता आधुनिक पद्धत समोर आली असून, बहुतांश शेतकरी यंत्राच्या साह्याने शेती करू लागला आहे. सद्य:स्थितीत खरीप हंगाम सुरू असून, पेरणीची लगबग सुरू आहे. परंतु, अशा लगबगीत आपले कसे होईल?, सोयाबीन लागवड वेळेवर होईल का?, मजूर मिळतील का?, मिळाले तर किती मजुरी मागतील?, असे एक ना अनेक प्रश्न शेतकरी अंकुश खिल्लारी यांना सतावत होते. अशावेळी मुलगी अक्षराला वडिलाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा दिसल्या. यावेळी तिने बाबा चिंता कशाला करता?, असे म्हणत टोकणयंत्राचे एक टोक स्वतःच्या हाती घेत एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन एकरांत सोयाबीन लागवड करून दाखवत शेतकरी बापाला मोठा आधार दिला. आपल्या मुलीचा पराक्रम पाहून कपाळावर उमटलेल्या चिंतेच्या रेषा काही क्षणांतच गायब झाल्या.
माशांना पोहणे शिकवायचे नसते...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन पेरणीसाठी ट्रॅक्टरची मजुरीचा खर्च, खत, बियाणे जास्त लागतात. त्यामुळे खर्चही वाढत जातो. याउलट गादीवाफा (बेड) जोडवळ पद्धतीने टोकण केल्यास ट्रॅक्टर मजुरी व खत बियाणांच्या खर्चात मोठी बचत होते. दुसरीकडे उत्पन्नही वाढून मिळते. पाण्याचा निचरा होत असल्याने अतिवृष्टी, सतत पावसामुळे पिकाची नासाडी होत नाही. त्यामुळे सध्या बरेच शेतकरी टोकण पद्धतीने सोयाबीन लागवडीवर भर देत आहेत. हे इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अक्षरा खिल्लारी हिला ज्ञात असल्याने तिने आपल्या कष्टकरी शेतकरी वडिलाला मदत करण्याचे ठरविले आणि मुलगीही कमी नाही हे दाखवून दिले.
पाच तासांत तीन एकर सोयाबीन लागवड...वडिलांना बेडवर टोकणयंत्र धरले तर समोर बांधण्यात आलेली काढीची एक बाजू हातामध्ये धरून अक्षराने एका शेतमजुरासोबत टोकणयंत्र ओढणे सुरू केले. सकाळी साडेअकरा वाजेपासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत पाच तासांमध्ये तीन एकरांवर सोयाबीनची लागवड केली.