शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By Admin | Updated: July 30, 2014 00:02 IST2014-07-29T23:59:07+5:302014-07-30T00:02:50+5:30

मारोती घ्यार, भांडेगाव उशिराने का होईना, पण शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाचे आगमन झाले नसल्याने ते वाळून गेल्याने दुबार पेरणीवरही टांगती तलवार दिसत आहे.

Due to the sowing crisis of the farmers | शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मारोती घ्यार, भांडेगाव
उशिराने का होईना, पण शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाचे आगमन झाले नसल्याने ते वाळून गेल्याने दुबार पेरणीवरही टांगती तलवार दिसत आहे. भांडेगाव परिसरात हे चित्र निर्माण झाले आहे.
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, साटंबा, जामठी परिसरात पंधरा दिवसांपूर्वी हलक्या पावसावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या होत्या. परंतु पावसाने उघडीप दिल्यामुळे काही शेतकऱ्यांची पिके वाळली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे़ दोन वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या कचाट्यामध्ये सापडत आहे.
शासनाकडून पीक नुकसानीची भरपाईही चांगल्या प्रकारे मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना आपला व्यवहार कसा करावा? असा प्रश्न पडला आहे़ यंदा खरिप हंगामातील दोन महिने उलटल्यानंतर पावसाने हलक्या स्वरुपात हजेरी लावली़ भीज पावसावर भांडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच खरिपाची पेरणी केली़; परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिली़ त्यामुळे सोयाबीन, कापूस आदी पिके पाण्याविना सुकू लागली आहेत़ उसनवारी करून महागडे बी-बियाणे, खत वाया जाते की काय? असा प्रश्न कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़ यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाले असून पहिल्याच पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. बहुतांश ठिकाणी पेरलेले बियाणे निघालेच नाही तर काही पिके पावसाअभावी करपून गेली.
जामठी, भांडेगाव, साटंबा शिवारात वैजनाथ डोरले, शंकर भवर, देविदास जगताप, आनंदा घ्यार, ज्ञानेश्वर भवर, रघुनाथ घ्यार, जयाजी घ्यार, राम घ्यार, प्रभू घ्यार यांच्या शेतात पेरलेले बियाणे पाण्याअभावी उगवलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. आता झालेल्या पावसाने मोठ्या आशेपोटी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती; परंतु या पेरणीवरही काही शेतातील पिके पुर्णत: वाळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Web Title: Due to the sowing crisis of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.