पंतप्रधान रोजगार योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST2021-02-14T04:27:43+5:302021-02-14T04:27:43+5:30

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना एकत्रित ...

The district's objectives of the Prime Minister's Employment Scheme have been met | पंतप्रधान रोजगार योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण

पंतप्रधान रोजगार योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना एकत्रित करुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) १५ ऑगस्ट २००८ पासून सुरु केली. पंतप्रधान रोजगार योजनेचे जिल्ह्याला ६५ लाभार्थिंना रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट दिले होते. यात जिल्हा उद्योग केंद्र ४५ व खादी ग्रामोद्योग महामंडळ २० लाभार्थीचा समावेश आहे. जिल्हा उद्योग केंद्राने ९२ (१९४.२६ लाख) व खादी ग्रामोद्योग महामंडळाने ११० (२६३.४६ लाख) असे २०२ प्रस्ताव जिल्ह्यातील १६ बँकांकडे मंजुरीसाठी पाठविले. परंतु जिल्ह्यातील बँकांनी जिल्हा उद्योगचे ३७ (४४ लाख १५ हजार) व खादी ग्रामोद्योगचे १४ (४१ लाख ५१ हजार) चे ५१ प्रस्तावच मंजूर केले आहेत.

मंजूर केलेल्या ५१ प्रस्तावांपैकी जिल्हा उद्योग केंद्राने १६ (३२ लाख ६ हजार) व खादी ग्रामोद्योग महामंडळाने ८ (१६ लाख ९४ हजार) असे २४ लाभार्थिना वाटप केले. बँकांकडे पाठविलेल्या २०२ प्रस्तावांपैकी बँकांनी जिल्हा उद्योग केंद्राचे २५ (७६ लाख) व खादी ग्रामोद्योगचे ३६ (८३ लाख २४ हजार) असे ६१ प्रस्ताव परत केले. जिल्ह्यातील बँकांकडे जिल्हा उद्योगचे ४० (७६ लाख १६ हजार) व खादी ग्रामोद्योगचे ६५ (१४७.३५) असे ५६ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

जिल्ह्यातील अलाहाबाद बँक, ॲक्सीस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडीया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडीया, सिंडीकेट बँक, युनीयन बँक आदी १६ बँकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. परंतु, काही मोजक्याच बँकांनी पाठविलेले प्रस्ताव मंजूर केले आहेत.

केंद्र व राज्य शासन बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवित आहे. पण बँका मात्र आपला हेकेखोरपणा कायम ठेवण्यात माहिर आहेत, हे प्रस्ताव मंजूर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंगर्गत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी २०२०-२१ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दर तीन महिन्याला होणाऱ्या बैठकीत आढावाही घेतला होता. बँकांना प्रत्येक बैठकीत सूचनाही दिल्या होत्या. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस.ए. कादरी, खादी ग्रामोद्योगचे प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी.एम. राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक गोपाल पवार यांनी प्रयत्न केले.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत योजनेचा जिल्ह्यातील युवकांनी लाभ घ्यावा. योजनेसंदर्भात काही आडचणी आल्यास जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग महामंडळाशी संपर्क साधावा.

-एस.ए.कादरी, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली

Web Title: The district's objectives of the Prime Minister's Employment Scheme have been met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.