मराठा जातीच्या प्रमाणपत्रांचे राज्यात सर्वप्रथम वितरण
By Admin | Updated: July 20, 2014 00:25 IST2014-07-19T23:49:15+5:302014-07-20T00:25:02+5:30
हिंगोली : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण लागू केल्यानंतर या संदर्भातील आदेश १५ जुलै रोजी काढण्यात आले.

मराठा जातीच्या प्रमाणपत्रांचे राज्यात सर्वप्रथम वितरण
हिंगोली : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण लागू केल्यानंतर या संदर्भातील आदेश १५ जुलै रोजी काढण्यात आले. त्यानंतर शनिवारी हिंगोली येथील तहसील कार्यालयात मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. महाराष्ट्रात सर्वात प्रथम असे प्रमाणपत्र देण्याचा मान हिंगोलीला मिळाला असल्याचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी सांगितले.
राज्य शासनाने मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्या अनुषंगाने १५ जुलै रोजी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने या संदर्भातील शासन निर्णय काढला. हा निर्णय प्राप्त होताच १९ जुलै रोजी हिंगोली येथील तहसील कार्यालयात मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानुसार प्रात्यनिधीक स्वरुपात पहिले प्रमाणपत्र सेनागव तालुक्यातील सिनगी खांबा येथील १२ वी उत्तीर्ण झालेल्या शुभदा भारत शिंदे या विद्यार्थिनीस देण्यात आले. त्यानंतर मराठा समाजातील ११ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, मराठा सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी मराठा सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ठोकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, खंडेराव सरनाईक, प्रा. माणिक डोखळे, शिवराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, राजू गोडबान, केशवराव सिरसाठ आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्निल जगताप यांनी केले.
प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे
मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधितांना प्रवेश निर्गम उतारा किंवा टीसी, वडिलांचे/ काकांचे/ आत्या/ आजोबांचे/ पंजोबाचा प्रवेश निर्गम उतारा किंवा टीसी, १३ आॅक्टोबर १९६७ पूर्वीचे वास्तव्य असल्याबाबतचा पुरावा ज्यामध्ये शेती असेल तर खासरा पत्रक किंवा पाहणी पत्रक किंवा वडिल/ आजोबा/ पंजोबा यांचा जन्म- मृत्यू नोंदणीचा उतारा आदी कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी सांगितले.