निराधार वृद्धांना नाही कोरोनाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST2021-04-09T04:31:55+5:302021-04-09T04:31:55+5:30
हिंगोली : एकीकडे संचारबंदी आणि जमावबंदी लागू असली तरीही दुसरीकडे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेकडो निराधारांच्या रांगा लागल्याचे ...

निराधार वृद्धांना नाही कोरोनाची भीती
हिंगोली : एकीकडे संचारबंदी आणि जमावबंदी लागू असली तरीही दुसरीकडे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेकडो निराधारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. त्यातही अनेकांना मास्क नाही, सामाजिक अंतराचा पत्ता नाही. त्यातच बँकेत मनुष्यबळ अपुरे असल्याने रक्कमही वेळेत मिळत नसल्याने दिवसभर ताटकळत बसण्याची वेळ आली होती. निराधारांच्या खात्यावर जानेवारीनंतर आता पुन्हा रक्कम आली आहे. मात्र, मागील चार ते पाच दिवसांपासूनच अनेक निराधारांनी बँकेत चकरा मारणे सुरू केले होते. काहींनी दलालांचा आधार घेत रक्कम काढण्याची स्लिप भरून दिलेली होती. त्यामुळे हे निराधार लागोपाठ चकरा मारत असल्याने आज पुन्हा यावे लागल्याने रोष व्यक्त करताना दिसत होते, तर बँक प्रशासनाने मात्र दर गुरुवारीच बँकेत निराधारांना रक्कम देण्याचे नियोजन केलेले आहे.
याठिकाणी सकाळी जवळपास सातशे ते आठशे निराधार वृद्ध जमलेले होते. दुपारनंतरही पाचशेपेक्षा जास्त लोकांची गर्दी या बँकेच्या परिसरात होती. बँकेतून रोज रक्कम दिल्यास आमची हेळसांड होणार नाही, असे लाभार्थींचे म्हणणे होते, तर दलाल शंभर रुपये घेऊन लवकर रक्कम काढून देतात. जे ही रक्कम देत नाहीत, अशांना वेळेत रक्कम मिळत नाही, असा लाभार्थींचा आरोप होता. शहरात परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन शाखा आहेत. यात अपुरे मनुष्यबळ असल्याने इतर शाखांकडे काही लाभार्थी वर्ग का केले जात नाहीत, हे कळायला मार्ग नाही. शिवाय आठवड्यात एका दिवसाऐवजी काही दिवस वाढवून दिले तर एवढी गर्दी होणार नाही. त्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.
याबाबत बीबी शाहिरा ही लाभार्थी महिला म्हणाली, पासबुक सकाळपासून बँकेत दिले. आता नावाचा पुकारा होण्याची वाट पाहत आहे. माझ्या मागून आलेल्यांना रक्कम मिळाली. किती रक्कम जमा होते, ती आम्हाला कधी मिळणार, हेही सांगितले जात नाही. खिडक्या वाढवत नसल्याने आम्हाला गर्दीत रेटारेटी करून रक्कम मिळवावी लागते. दर तीन महिन्यांनी नशिबी हेच येते.
जाहेदाबी ही महिला म्हणाली, मंगळवारपासून मी चकरा मारत आहे. मात्र पैसे मिळत नाहीत. यापूर्वी जानेवारीत रक्कम मिळाली होती. आता पैशांची चणचण असून महत्त्वाच्या कामासाठी पैसे लागत असतानाही रक्कम मिळत नाही. येथे एकच खिडकी आहे. त्या वाढविल्या जात नाहीत. दर महिन्यात हेच रडगाणे आहे.
अनिता सीताराम खडसे ही महिला म्हणाली, चार दिवसांपासून मी येथे रोज येते. माझ्या खात्यावर रक्कम जमा असल्याने उद्या या असे म्हणण्याची आवश्यकता नाही. मात्र, सर्व निराधारांना एकत्र बोलावून आम्हाला कोराेनाच्या खाईत ढकलण्यात येत आहे. आमची ही समस्या कोणीच सोडवत नाही.
बँक व्यवस्थापक दीपक सरनाईक म्हणाले, सध्या बँकेचा कारभार दोनच कर्मचाऱ्यांवर चालू आहे. कोरोनामुळे दोन कर्मचारी कमी झाले. अन्यथा यात आठवडाभर निराधारांना वाटप करून आम्ही ही समस्या येऊ देत नाही. शिवाय रोज जेवढ्या जास्त लोकांना वाटप करता येईल, तेवढे वाटप करतो. वाटपापूर्वी बाहेरच्या कोणत्याही दलालाचा आधार घेऊ नका. कुणालाही पैसे देऊ नका, हे बजावून सांगितले तरीही काहीजण बाहेर असे करतात. त्यात बँक कर्मचाऱ्यांचा कोणताच सहभाग नसतो. आम्ही पासबुक व स्लिपच्या क्रमांकाप्रमाणे रक्कम वाटप करतो.