गावात सिमेंट रस्त्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST2021-03-04T04:56:57+5:302021-03-04T04:56:57+5:30
रस्त्यावर घाण पाणी हिंगोली : शहरातील जिजामाता नगरातून गायत्री शक्तीपीठकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात नळयोजनेचे ...

गावात सिमेंट रस्त्याची मागणी
रस्त्यावर घाण पाणी
हिंगोली : शहरातील जिजामाता नगरातून गायत्री शक्तीपीठकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात नळयोजनेचे पाणी साचत असल्याने या भागातील नागरिकांना व वाहनचालकांना रस्त्यावरून ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. तसेच खड्डयांतील पाणी खूप दिवसांपासून साचले आहे.
गतिरोधक बसविण्याची मागणी
खुडज : सेनगाव तालुक्यातील खुडज गावापासून सेनगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हा रस्ता नव्याने केल्याने अनेक वाहने येथून भरधाव वेगाने धावत आहेत. वाहने वेगाने धावत असल्याने याठिकाणी अनेकदा अपघात होत आहेत. यासाठी या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
वानरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त
सवना : सेनगाव तालुक्यातील सवना, वायचाळ पिंपरी, ब्राह्मणवाडा आदी परिसरात काही दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. घरावरील कौलांवरून वानरे उड्या मारत आहेत. तसेच अंगणात ठेवलेल्या वस्तूंची नासाडी करीत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वृक्ष लागवडीची गरज
हिंगोली : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात येते. मात्र, वृक्ष लागवडीनंतर यातील बहुतांश रोपटी वाळून जात आहेत. तसेच वृक्षतोडही होत असल्याने झाडांची संख्या कमी होत आहे.
पुलाचे कठडे गायब
हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी मार्गावरील काही पुलाचे कठडे गायब झाले आहेत. या मार्गावरून पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुलाचा अंदाज येत नसल्याने धोका निर्माण होत आहे. पुलाचे लोखंडी कठडे गायब करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पाणीटंचाईच्या जाणवताहेत झळा
हिंगोली : तालुक्यातील अनेक गावांतील जमिनीतील पाण्याची पातळी खालावत आहे. पाणीसाठे आटत चालल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. सध्या थंडीचे दिवस आहे. आतापासूनच पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांची भटकंती वाढली आहे.
सौरदिवे बनले शोभेची वस्तू
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने अनेक ग्रामपंचायतींमध्ये सौरदिवे बसविण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच सौर दिवे बंद पडत आहेत. बॅटऱ्याही चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा कोणताही लाभ गावकऱ्यांना होत नसल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
दुभाजकाची मागणी
कळमनुरी : शहरातील डॉ. शंकरराव सातव महाविद्यालय ते बसस्थानक दरम्यान वाहनांची नेहमी वर्दळ असते. अनेक वेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावर दुभाजक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गिरगाव ते वसमत रस्त्याची दुरवस्था
वसमत : येथून गिरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपले वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वरांचा अपघातही घडत आहे. तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी हा रस्ता दुरुस्त करावी, अशी मागणी होते.