तीन लाखांच्या लाचेची मागणी; हिंगोली तहसीलदारांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST2021-06-02T04:22:50+5:302021-06-02T04:22:50+5:30
याबाबत २५ मे २०२१ रोजी अजय सुदामराव नागरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. नागरेंनी भाड्याने घेतलेले ...

तीन लाखांच्या लाचेची मागणी; हिंगोली तहसीलदारांवर गुन्हा
याबाबत २५ मे २०२१ रोजी अजय सुदामराव नागरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. नागरेंनी भाड्याने घेतलेले पाच टिप्पर मागील वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी वाळूची वाहतूक करताना हिंगोली पोलिसांनी पकडले होते. ते हिंगोली पोलीस ठाण्यात लावून याबाबत तहसीलदारांकडे पत्रक पाठवित पुढील कार्यवाहीबाबत कळविण्यात आले होते. त्यावरून नागरेंनी तहसीलदारांची भेट घेतल्याचे तक्रारीत म्हटले. तेव्हा पकडलेल्या पाचही टिप्परवर लवकर कार्यवाही करून ते लवकर सोडविण्यासाठी व मागील महिन्याचे वाळूचे टिप्परवर कार्यवाही न करण्यासाठी राहिलेली रक्कम असे मिळून ३ लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले होते. यावरून २५ मे रोजी या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली. त्यात तहसीलदारांनी ३ लाखांची लाच स्वीकारण्याची सहमती दर्शविली असल्याचे म्हटले आहे. यावरून तहसीलदार पांडुरंग माचेवाडविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच पुढील कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधकचे उपाधीक्षक नीलेश सुरडकर, कर्मचारी विजय उपरे, तान्हाजी मुंढे, विनोद देशमुख, ज्ञानेश्वर पंचलिंगे, अविनाश कीर्तनकार, प्रमोद थोरात, सरनाईक आदींनी यशस्वी पार पाडली.
उलटसुलट चर्चांना उधाण
या प्रकरणात तक्रार दिल्याच्या दिवशीच पडताळणीही झाली. मात्र, त्याबाबत तक्रार दाखल करण्यास विलंब का झाला, हे कळायला मार्ग नाही. यावरून उलटसुलट चर्चांना उधाण येत आहे. शिवाय यामागे राजकीय शक्ती असल्याच्याही चर्चा होत आहेत. याबाबत उपअधीक्षक सुरडकर यांना विचारले असता ते म्हणाले, तक्रारदार २६ रोजी तहसीलदारांना रक्कम नेऊन देणार होता. मात्र, नंतर त्याने माघार घेतली. मात्र, पुढील पडताळणीत सर्व बाबी आढळल्याने लाचलुचपत प्रतिबंधकतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याला विलंब झाला.