जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:04+5:302021-03-21T04:28:04+5:30
हिंगोली: बेसुमार झाडांच्या तोडीमुळे जंगलाचा ऱ्हास होऊ लागला आहे. हे दृष्टीआड करून चालणार नाही. यासाठी झाडांची जोपासणा करणे गरजेचे ...

जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळतोय
हिंगोली: बेसुमार झाडांच्या तोडीमुळे जंगलाचा ऱ्हास होऊ लागला आहे. हे दृष्टीआड करून चालणार नाही. यासाठी झाडांची जोपासणा करणे गरजेचे आहे. जंगल वाचले तर आपल्याला स्वच्छ हवा, पाणी मिळेल. एवढेच काय ‘वर्ल्ड फॉरेस्ट डे’ साजरा केल्याचे समाधान मिळेल.
चंगळवादी जीवनशैलीसाठी होत असलेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकापासून जाणवू लागले. त्यातून जंगले वाचविण्याची संकल्पना पुढे आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी ‘वर्ल्ड फाॅरेस्ट डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.
‘दृष्टीआड सृष्टी’ असे आपण नेहमीच म्हणत असलो तरीपण या सृष्टीच्या आड असे काय आहे? जे आपल्याला दिसत नाही. अशा कितीतरी गोष्टी सृष्टीची चक्रे फिरवत असतात. यामध्ये दगड, माती, हवा, पाणी असे निर्जीव घटक आहेत. त्याचप्रमाणे झाडे, किडे, साप, मासे आणि माणूसप्राणी असे विविध सजीवही आहेत.
२००२ साली जंगल संवर्धनासाठी जैवविविधता कायदा मंजूरही करण्यात आला आहे. त्यानंतर सामूहिक वनहक्क कायदाही तयार केला. आदिवासींचे व इतर परंपरेने राहणाऱ्या आणि जंगलांचे संवर्धन करणाऱ्या वन निवासीयांना जंगलावरील हक्क याला मंजुरीही देण्यात आली. वनाचे संरक्षण व्हावे, यासाठी गावोगावी समित्याही स्थापना करण्यात आलेल्या आहेत.
समित्यांनी पुढाकार घेणे गरजेचे
कंटाळा करून चालणार नाही. जागतिक वन दिन वर्षानुवर्षे आपण साजरा करू; पण जंगलातील झाडे वाचविणेही गरजेचे आहे. हे नेमलेल्या समितीने लक्षात घेणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात उपाययोजना करताना आणि धोरण ठरवताना जंगलांबाबत योग्य विचार होतो आहे का? याची शहनिशा करणेही तितकेच गरजेचे आहे.
१५ हजार झाडांची केली जाते जोपासना
हिंगोली हा मराठवाड्यातील सर्वात लहान जिल्हा असला तरी आजमितीस येथील वन विभागात १५ हजार झाडांची जोपासणा केली जाते. यामध्ये निंब, बाभूळ, आवळा, कवठ, बेहडा, वड, साग आणि वनौषधी झाडांची चांगल्या पद्धतीने जोपासणा केली जाते. हिंगोलीचे वनक्षेत्र ०.५० हेक्टरवर वसलेले असल्याचे विभागीय वनाधिकारी कामाजी पवार, वन परीक्षेत्र अधिकारी व्ही. बी. टाक, वन परिमंडळ अधिकारी जी. पी. मिसाळ यांनी संगितले.
देशी झाडांची लागवड करावी
सततची दुष्काळजन्य परिस्थिती, शेती व्यवसायाची ढासळलेली स्थिती यामुळे आपले अतोनात नुकसान होत आहे, तसेच पर्यावरण साखळीचे मोठे नुकसान होत आहे. गिलरसिडिया, काशीद, ऑस्ट्रेलियन बाभूळ इत्यादी झाडांवर कोणताही पक्षी बसत नाही. एवढेच काय घरटे बांधत नाही. या पक्ष्यांना या झाडांवर त्यांचे अन्न मिळत नाही, तसेच या झाडांखाली वन्यप्राण्यांसाठी चारा निर्माण होत नाही. त्यामुळे या झाडांवर अवलंबून असलेले अनेक पक्षी व प्राणी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
-विश्वांबर पटवेकर, सर्पमित्र, हिंगोली.