६०५ चालक-वाहकांचा रोज २३ हजार प्रवाशांशी संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:45+5:302021-02-24T04:31:45+5:30
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण रोज वाढू लागले आहेत. त्यामुळे ही चिंतेची बाब बनली आहे. जिल्ह्यात एस. टी. महामंळाचे हिंगोली, वसमत ...

६०५ चालक-वाहकांचा रोज २३ हजार प्रवाशांशी संपर्क
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण रोज वाढू लागले आहेत. त्यामुळे ही चिंतेची बाब बनली आहे. जिल्ह्यात एस. टी. महामंळाचे हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. हिंगोली आगारात ५७ बसेस असून चालक १२३, वाहक १२३, वसमत आगारात ५५ बसेस असून चालक ११०, वाहक १०५ तर कळमनुरी आगारात ३० बसेस असून चालक ७२, वाहक ७२ अशी संख्या आजमितीस कार्यरत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार एस. टी. महामंडळाच्या चालक आणि वाहकांना लस दिली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करीत आहेत. प्रवाशांनी मास्क घातला तरच त्यांना बसेसमध्ये प्रवेश द्या, अशा सूचना एस. टी. महामंडळाने चालक-वाहकांना दिल्या आहेत. परंतु, काही प्रवासी मात्र बसमध्ये चढतेवेळेस मास्क घालत आहेत. नंतर मात्र बसमध्ये जागा मिळाल्यास मास्कचा त्यांना विसर पडत आहे. कोरोनामुळे काही मार्गावर प्रवासी संख्या घटली असली तरी बाजारपेठेच्या गावी मात्र प्रवासी संख्या वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे चालक-वाहकांचा संपर्क प्रवाशांशी येवू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने एस. टी. महामंडळाच्या चालक-वाहकांचा विचार करुन करुन त्यांना कोरोना लस देणे गरजेचे आहे. हिंगोली २६०, कळमनुरी १४८ आणि वसमत आगारातील बसेसच्या रोजच्या फेऱ्या २६० अशा एकूण ६६८ होत आहेत.
महामंडळाच्या वतीने केला जातो मास्क, सॅनिटायझरचा खर्च
मार्च महिन्यापासून कोरोना आजाराने डोके वर काढले आहे. चार-पाच महिने तर कोरोनामुळे एस. टी. बसेस बंदच होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेस सुरु केल्या आहेत. आता आठ-दहा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे. गर्दीतही चालक-वाहकांना प्रवास करावा लागत आहे. चालक-वाहकांना एस. टी. महामंडळाच्या वतीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप वेळोवेळी केले जाते आणि आजही केले जात आहे. बस डेपोतून बाहेर सोडतेवेळेस स्वच्छपणे धुतली जाते. चालक, वाहकांना दिल्या जाणाऱ्या मास्क, सॅनिटायझरचा सर्व खर्च एस. टी. महामंडळाच्या वतीने केला जातो. याचबरोबर चालक-वाहकांची पुरेपुर काळजीही घेतली जाते.
-मुक्तेश्वर जोशी, विभाग नियंत्रक ,एस. टी. महामंडळ, परभणी विभाग
प्रतिक्रिया
कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या गेल्या दहा-बारा दिवसांपासून कमी-जास्त होत आहे. चालक आणि वाहकांना सॅनिटायझर, मास्क घालून प्रवास करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रवासी मास्क न घालता येत असेल तर त्यास महामंडळाच्या बसमधून उतरा असेही सांगितले आहे.
-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, आगार, हिंगोली